धक्का
अंघोळ उरकून मामी गच्चीत येऊन बसल्या होत्या उन्हात. ऊबदार वाटत होतं अगदी.
सुनेला हाक मारून चहा मागणार इतक्यात तिचाच आवाज आला. नवऱ्याशी बोलत होती.
“मी काय म्हणते...”
“बोला...”
“मामींचा मुलगा भांडून घर सोडून गेला, त्याला झाली १५-१६ वर्षं. तुम्ही मामींना आपल्याकडे घेऊन आलात. त्यांच्या घराची नीट व्यवस्था करून पैसे त्यांच्या नावावर नीट गुंतवलेत.
माझं काही म्हणणं नव्हतं.
पण आता अलीकडे मलाही पूर्वीसारखं जमत नाही घरात. थकवा येतो लगेच....”
मामींनी कान टवकारले, हृदयाची धडधड वाढली, हातपाय कापायला लागले.
“मग म्हणणं काय तुझं?”
क्षणभर स्तब्धता.
आता मामींचा जीव कानात गोळा झाला.
“मला वाटतं, एक बाई ठेवावी दिवसभराची. घरात मला थोडी मदतही होईल आणि मामींची अंघोळ, वेणी, त्यांच्याबरोबर कोपऱ्यापर्यंत फिरून येणं हेही करेल.
त्याही दमतात हल्ली एवढ्या तेवढ्याने.
सांगू का आपल्या पल्लवीला कुणी बाई शोध म्हणून?”
“चालेल.......”
पुढचं बोलणं मामींना ऐकू येईना झालं. डोळ्यांना लागलेली धार पुसण्यात गुंतल्या त्या.
राधा मराठे
१५.१.२०२३
Comments
Post a Comment