दुसरं लग्न
उमेश रिक्षातून उतरला आणि बॅग घेऊन सोसायटीत शिरला. लिफ्टमधून बाहेर पडला तर घराचं दार उघडं आणि आतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज. कोण असेल असं नवल करीत तो घरात शिरला. समोर सिंगल सोफ्यावर त्याची आई-स्नेहा बसली होती आणि दाराकडे पाठ करून मोठ्या सोफ्यावर कुणीतरी पुरूष बसला होता. करडे केस, मागून टक्कल पडायला सुरूवात झालेली. त्याला बघून आई एकदम खुष होऊन उठली. “अरे, तू अचानक आज? उद्याचं तिकीट आहे म्हणाला होतास ना?” तिच्या मनातला आनंद लपत नव्हता. त्याचे हात धरून तिने त्याला सोफ्यावर बसवला आणि पाण्याचा ग्लास भरून त्याच्या हातात दिला. पाणी पिऊन तो म्हणाला, “अगं, अचानक आजची फ्लाईट आहे असं कळलं. तिकीट बदलून मिळालं. म्हटलं तुला सरप्राईज द्यावं.” ती खुषीत हसली आणि त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाली, “बरं केलंस.” मग त्या माणसाकडे वळून म्हणाली, “हा माझा मुलगा उमेश. आणि उमेश हे श्री. अरूण. नुकतेच आलेत आपल्या सोसायटीत राहायला. पलिकडच्या विंगमधला राजाध्यक्षांचा फ्लॅट घेतलाय त्यांनी. xxx कंपनीतून नुकतेच रीटायर झालेत.” मग परत त्यांच्याकडे वळून म्हणाली, “मी चहा करतेय, तुम्ही घेणार का परत?” पण उमेश म्हणाला, “आई, थोड्या वेळाने कर चहा. मी आधी आवरतो. खोली रिकामी करण्याच्या नादात सकाळी आंघोळ सुद्धा नाही केलीय मी. आवरतो आणि मग चहा घेत बोलू निवांत.” असं म्हणून तो आत गेला. अरूण उठले, “मी निघतो. तुमचा मुलगा इतक्या दिवसांनी आलाय, चालू देत तुमच्या मायलेकाच्या गप्पा.”
ते गेल्यावर स्नेहा चहा करायला गेली. मग चहा घेता घेता गप्पा रंगल्या. त्याची परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यू.... मध्येच तो म्हणाला, “आई, ते कोण आले होते?”
“अरे, ते राजाध्यक्षांच्या फ्लॅटमध्ये ....” तिचं वाक्य तोडून तो म्हणाला,
“ते सांगितलंस तू, पण कोण, कुठले वगैरे.....”
“अरे, बंगलोरला होते इतकी वर्षं. xxx कंपनीत. ४-५ वर्षांपूर्वी बायको गेली कॅन्सरने. मुलगी लग्न होऊन गेली, मुलगा ऑस्ट्रेलियाला सेटल झालाय. रीटायर झाले, मग बंगलोरला एकटं नको राहायला, म्हणून आले इथे. मुलगी इथेच असते त्यांची. तिच्याजवळच कुठेतरी फ्लॅट बुक केलाय, तो तयार होईपर्यंत इथे राहतायत.”
उमेशने विषय बदलला. पुढचा महिनाभर उमेशसाठी नवे कपडे, घराच्या रीनोव्हेशनचे प्लॅन्स, त्याला हव्या असलेल्या कंपनीकडून अपॉईंटमेंट लेटर, त्याच्या जॉईनिंग फॉरमॅलिटीज यात भुर्रकन उडला. तिची १० दिवस रजाही झाली. याच दरम्यान तिने एक छोटी पार्टी केली. तिचा भाऊ, बहीण, दीर, इतर काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी. सगळ्यांनी भरभरून उमेशचं कौतुक केलं. त्याला पुढच्या वाटचालीसाठी भरघोस आशीर्वाद दिले. आता उद्या उमेश त्याच्या नोकरीवर रुजू होणार म्हणून रात्री दोघं निवांत बोलत होती.
“आई, ते अरूणकाका आले नाहीत, दिसलेही नाहीत इतक्या दिवसांत.”
“अरे, जाता-येता होते ना भेट खाली. आणि ते एकदा ऑफिसच्या बाजुला आले होते त्यांच्या काही कामासाठी, तर कॉफीही घेतली आम्ही एकदा.”
उमेश चमकला. खाली भेटतात? आणि त्या बाजुला काही काम होतं ..... खरंच की मुद्दाम...
त्याने एकदम डोकं जोरात हलवलं. छे, काय काहीतरी विचार आणि आईबद्दल ....
उमेश रुजू झाला आणि एक वेगळा दिनक्रम सुरू झाला स्नेहाचा. स्वयंपाक करताना आवर्जून त्याच्या आवडीचं असं काहीतरी करण्याचा कटाक्ष असायचा तिचा. घरी येतांना पावलं जरा जलद पडायला लागली. भाजी आणि इतर किरकोळ घरगुती खरेदी करताना समोर दिसेल ते असं न करता चोखंदळपणे, विचार करून, थोडं दूर जाऊन उत्तम असेल तेच घेणं असं व्हायला लागलं. महिनाभराने रात्रीची जेवणं झाल्यावर तिचा फोन वाजला.
“हॅलो, ओह तुम्ही – बोला, काय म्हणता .......
नाही हो, विसरतेय कशाने. पण लेक घरी आलाय ना. २ वर्षं लांब होता, हॉस्टेलचं राहणं आणि मेसचं जेवण, जरा त्याचं कौतुक करतेय. .......
हो, त्या xxx कंपनीत रुजू झाला ना, झाला महिना. ......
छे, छे, अजिबात नाही. त्याचा स्वकष्टांवर मिळालेल्या यशावर जास्त विश्वास आहे. त्याला नाही आवडणार असं काही........
ओके, गुड नाईट.”
बोलणं संपल्यावर उमेशची प्रश्नार्थक नजर पाहून म्हणाली, “अरे, त्या अरूणचा फोन होता. विचारत होते, दिसला नाहीत-भेट नाही झाली, विसरलात की काय.....”
“ते माझं काय म्हणत होतीस?”
“मला म्हणाले त्यांच्या कंपनीचं ऑफिस उघडतंय इकडे, शब्द टाकू का.....” उमेश दचकला.
“ए आई, त्यांना सांग हं, मला असलं काही नकोय म्हणावं कुणी शब्द बिब्द टाकायला.”
“अरे, हो.. तेच सांगितलं ना मी, ऐकलं नाहीस का तू.”
किरकोळ इकडचं तिकडचं बोलून उमेश झोपायला गेला. पण ते मि. अरूण जाईनात त्याच्या डोक्यातून. कोण हा माणूस, आईशी इतक्या जवळिकीने कसा बोलतो आणि त्या दिवशी घरी का आला होता? बघू, आई शांत आहे तोवर काही चिंता नाही. तिचं वागणं बदललेलं दिसलं तर करता येईल विचार. त्यांचाच विचार करत त्याला झोप लागली.
उमेश रमला त्याच्या कामात. जुने मित्र पुन्हा भेटले, ऑफिसमध्ये नवे भेटले... संध्याकाळी कधी ऑफिसमध्ये उशीरपर्यंत काम, कधी मित्रांसोबत टाईम पास, मग त्याने जिम सुरू केलं. आईशी बोलणं व्हायचंच रात्री घरी आल्यावर. पण उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करताना. दिवसभरात एखादा फोन.
पुढच्या आठवड्यात अचानक पुन्हा अरूणचा विषय आला डोक्यात. दुपारी मित्रांबरोबर कॉफी प्यायला गेला कॅफेत. आत आई दिसली, बरोबर ते अरूण. तो जरा आड बसला. आईला दिसणार नाही असा. त्यांची कॉफी येईपर्यंत आई आणि अरूण उठून निघून गेले. त्याचं चित्त उडलं कॉफीतलं. संध्याकाळी कुठेही न जाता तो सरळ घरी आला. तर आई निवांत बसली होती बाल्कनीत काहीतरी वाचत.
“अरे, लवकर आलास.”
“मी रोजच्याच वेळेवर आलोय, तू लवकर आलीयस.”
“अरे, आज ना अरूणच्या मुलीच्या लग्नाचा वाढदिवस होता. ते म्हणाले गिफ्ट घ्यायला मदत करा. गिफ्ट घेऊन ते गेले मुलीकडे, मग कंटाळा आला परत ऑफिसात जायचा. घरीच आले झालं......”
“आई, भूक लागलीय. जेवायला लवकर वाढ आज. रात्री थोडं काम करीन घरीच.”
रात्री खोलीचं दार लावून तो कामाला बसला. पण डोकं चालेना……
आई त्या माणसाबरोबर बोलते, अलिकडे घरी आला नाही पण तो घरी आला तेव्हा तर घरात बसला होता, म्हणजे त्याआधी पण आला असेल. आज तर आई त्याच्याबरोबर खरेदीला गेली - हे सगळं त्याला काही केल्या रुचेना. पण ती तर अगदी सहज बोलत होती. काही वेगळं नाही जाणवलं त्याला. पण ते अरूण ..... माझ्या नोकरीसाठी शब्द टाकतो म्हणायची काय गरज त्यांना मी काय डफ्फर आहे का?
कंटाळून पीसी बंद करून त्याने पुस्तक उघडलं आणि वाचता वाचता .......
मग त्याचं नकळत आईकडे बारीक लक्ष राहू लागलं. ती घरी कधी येते, ऑफिसला जाताना नेहमीसारखी जाते की विशेष तयार होऊन जाते, कुठे काही खटकण्यासारखं, गैर आढळलं नाही. मग त्याला अपराधी वाटायला लागलं. आईबद्दल आपण असा विचार केला, तिचा संशय घेतला याचं दडपण आलं त्याला. अखेर नाईलाजाने तो मामाकडे गेला. बाबा गेल्यावर त्याच्या मामाने खूप आधार दिला होता त्या दोघांना. पैसे तर होते आईकडे, तिची नोकरी चालू होतीच व्यवस्थित. पण सगळे व्यवहार निस्तरायला मामा आणि काका नसते तर काय करणार होता तो आणि त्याची पार कोसळलेली आई?
त्याचं बोलणं ऐकूनही मामा शांत होता.
“उमेश, माझ्याही लक्षात आल्या आहेत काही गोष्टी. मी भेटलोय एकदा त्या माणसाला. बरा वाटला मला. तुझी जबाबदारी होती म्हणून तेव्हा आम्ही काही बोललो नाही, पण आता तिला सोबत हवीशी वाटत असेल तर चूक नाही त्यात काही. उद्या तुझं लग्न होईल, स्वत:चा संसार होईल. कदाचित परदेशातही जाशील. मग तिने एकटीने कसं जगायचं?”
बरंच बोलला मामा. इकडे-तिकडे ऐकलेल्या-पाहिलेल्या गोष्टी ऐकून त्याच्या मनात शंका आल्या आहेत, शिवाय आईबद्दल मुलं जरा जास्त पझेसिव्ह असतातच, त्यात त्याची काही चूक नाही असंही म्हणाला तो.
“मी येतो एकदा, काकाला बोलावतो तुझ्या. बोलू आपण तिच्याशी.”
पण उमेशला चैन पडेना. आई हो म्हणाली दुसऱ्या लग्नाला तर? ती जाईल तिकडे की तोच येईल इकडे? क्षणभर तो अडखळला, बाबांच्या वयाचे आहेत ते, आपण असं एकेरी का उल्लेख करतो त्यांचा? मनाशी झालं म्हणून काय, हे बरोबर नाही.
पण विचार जाईनात मनातून. ना ना उलट सुलट विचारांनी हैराण झाला तो. अखेर कसंबसं समजावलं त्याने मनाला, मामा म्हणालाय ना, बघु. आणि आईला वाटत असलं असं काही तरी ते कसं थांबवू शकेल तो? त्याने विरोध केला तर ती ऐकेल, पण मनाने खट्टू होईल. पूर्वीसारखं नाही राहणार नातं. नकळत तो घरात गप्प राहायला लागला. आईने विचारलं सुद्धा काय झालं म्हणून, पण कामाचं लोड आहे सांगून वेळ मारून नेली त्याने.
दोन महिन्यांनी स्नेहाचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्याने मामा आणि काकाला बोलवायचा घाट घातला.
“आई, काय करू या आपण तुझ्या वाढदिवसाला?”
“चल रे, माझे कसले वाढदिवस करतोस. काही नको.”
“नाही, मी तर दोन वर्षं लांबच होतो, या वर्षी ५१वा वाढदिवस आहे, तर करू या ना काहीतरी सेलीब्रेशन. मामा-मामी आणि काका-काकू, बस. मावशी पण नको. लांब राहते ती फार. तिला आणायला जा, पोचवून या. व्याप होतो.”
तिला फार काही बोलू न देता त्याने सगळा बेत आखला. मामाला कळवलं. तूच बोल काकाशी काय ते, मी फक्त वाढदिवसाबद्दल सांगतो म्हणाला.
आता त्याला दुसरं काही सुचेनासं झालं. अखेर तो दिवस उजाडला. त्याने रजा घेतली होती. संध्याकाळी मामा-मामी आणि काका-काकू आले. चहा-खाणं झालं आणि मामाने विषय काढला.
“स्नेहा, तुला आता ५१ पूर्ण झाली. उमेश मार्गाला लागलाय. आता त्याची काही चिंता नाही. तू काय ठरवलं आहेस पुढे?”
“आता काय ठरवायचं आहे? उमेश म्हणेल तेव्हा त्याचं लग्न. त्याने कुणी शोधली असली तर ती, नाहीतर शोधू आपण.”
“नाही वहिनी, तुमच्याबद्दल म्हणतोय आम्ही.”
“माझ्याबद्दल?”
“म्हणजे - - - - अं.....”
“मी सांगते. वन्सं, पुन्हा लग्न करण्याचा काही विचार केलाय का तुम्ही? ५१ हे काही फार जास्त वय नाही. अजून कुणी योग्य माणूस भेटेल तुम्हाला. उमेश त्याच्या आयुष्यात रमला की एकटेपणा येईल. पण तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. आत्ता विचार केलात तर काहीतरी करता येईल – म्हणजे कुणी योग्य माणूस शोधता येईल.....” मामी एका दमात बोलून मोकळी झाली.
स्नेहा एकदम गप्प झाली. एक अस्वस्थ शांतता पसरली.
“आई ......”
तिने त्याला थांबवलं.
उठून थोडं पाणी प्याली. मग शांत स्वरात बोलायला लागली.
“उमेश १५ वर्षांचा होता, अपघातात शिरीष – त्याचे बाबा आणि आजी-आजोबा एकदम जागच्या जागी गेले तेव्हा. अति दु:खाने मी तेव्हाच कसे प्राण सोडले नाहीत ते मला नंतर कळलं. माझ्या मनाच्या एका कप्प्यात उमेश होता. त्याच्यासाठी आपल्याला उभं राहायला हवं हे त्या भीषण दिवसांतही माझं मन मला बजावत होतं.
नंतरच्या कठीण दिवसांत तुम्ही दोघांनी – नाही चौघांनी - मला वेळोवेळी आधार दिलात. विम्याचे पैसे, शिरीष आणि बाबांच्या नावावर असलेली मिळकत, हे घर – सगळं माझ्या नावावर करायला तुम्हाला किती आणि काय काय उपद्व्याप करावे लागले ते पाहिलेत मी. सोसायटीच्या सेक्रेटरींनी केलेली अडवणूक, रात्री बेरात्री येणारे ब्लँक कॉल्स, अवेळी वाजणारी दारावरची बेल ..... किती मनस्ताप आणि प्रत्येक वेळी एका फोनवर धावून येणारी तुम्ही - माझी माणसं ...
उमेश MCS झाला, IIMला ॲडमिशनही मिळवली त्याने मेहनतीने. गेली दोन वर्षं एकटी राहत असताना आला होता माझ्या मनात हा विचार. उमेशचं लग्न होईल, त्याचा संसार, स्वतंत्र आयुष्य. आपण कुठे असू त्यात? पण त्या दिशेने विचार करताना लक्षात आल्या काही गोष्टी.
एकतर इतकी वर्षं मला सगळं आपल्याच मर्जीने करायची सवय लागली आहे. तीही मी प्रयत्नाने लावून घेतलीय. आई होत्या तर मला घराची काहीच जबाबदारी नव्हती. त्या सांगतील ते आणि तेवढंच करायचं. उमेशकडे बाबांचं लक्ष होतं. पैशाची सगळी देखरेख शिरीष करत होता. अचानक सगळं अंगावर पडलं. फार त्रास झाला. रोजची लढाई होती – माझी माझ्याशी. किती परावलंबी होते. तिथून सुरूवात करून पूर्ण स्वावलंबी व्हायचं – हा रस्ता सोपा, सरळ नव्हता. पण उमेशकडे बघून मी ते आव्हान स्वीकारलं. एकेक गोष्ट नीट प्लॅन करून पार पाडत गेले. उमेशला पोरकं वाटू नये यासाठी सतत जागरूक राहिले. त्यानेही सतत माझी पाठराखण केली. माझा बिघडलेला नूर, थकलेला चेहरा त्याला लगेच कळायचा. परीक्षेत तर त्याने कधीच निराशा नाही केली. आता पुन्हा ही सगळी बसलेली घडी बदलायची, काही अपेक्षेने. आणि तिथे हवं तसं दान नाही पडलं तर? तरूण वयात मन आणि शरीर कोवळं असतं, आपण वाकवू तसं वाकतं. डोळ्यात भविष्याची स्वप्नं असतात. ती पूर्ण करायला आपलं माणूस असतं आपल्यासोबत. पण आता कसली स्वप्नं बघणार मी? उमेशच्या संसाराची, सुखाची. लग्न करून वेगळं राहिले किंवा त्या अनोळखी माणसालाच इथे राहा म्हटलं तरी दोन्ही कठीण. जे घर उभं करायला मी काहीही केलं नाही, तिथे मालकीण म्हणून वावरायचं किंवा या घरासाठी ज्याने काहीही केलेलं नाहीये, त्याची ताबेदारी पत्करायची. उमेशला एकटं सोडून जायचं किंवा इतक्या मोठ्या वयात एका परक्या माणसाला स्वीकारायची परीक्षा द्यायला लावायची.
आणि उमेश कशाला, मलाही ही परीक्षा कठीणच नाही का? एकदा नवरा म्हटला की त्याच्या काही अपेक्षा असणारच. त्या माझ्या चौकटीत नाही बसल्या तर पुन्हा वाकणं. जून फांदी जबरदस्तीने वाकवता नाही येत. आणि .......”
ती अडखळली. “बोला वन्सं, बोलून टाका. उमेश काही लहान नाही. समजून घेईल तो.”
“नवरा म्हटलं तर पुन्हा त्याचा सहवास आला, त्या कल्पनेने मी जास्त दचकले. कितीतरी दिवस मी तोच विचार करत राहिले, वयाच्या या टप्प्यावर हे जमेल का? शिरीष असता तर आमचं दांपत्य जीवन सुरळीत विनाखंड सुरू राहिलंच असतं. पण ३० वर्षांच्या संसारानंतर मनात रुजलेलं प्रेम, एकमेकांच्या काही गोष्टी न सांगता कळणं, समजून घेणं या नव्या लग्नात तितक्याच सहज असतील का?”
“पण स्नेहा, हा सगळा असा नकारार्थी का विचार करतेस? कदाचित असं काही होणारही नाही. सगळं सुरळीत होईल.” नकळत मामाने उमेशकडे पाहिलं. खूप काही बोलायचं असावं त्याला, पण त्याला नजरेने गप्प केलं त्याने.
“बरोबर आहे तुझं. पण घेऊन बघू एक संधी असा विचार करून प्रयोग करायची तयारी नाही माझी. चांगलंच होईल हा आशावाद असावा आणि होणार नाही याची तयारी ठेवावी असं म्हणतो ना आपण. मग तो आशावाद मी उमेशसाठी राखून ठेवेन. त्याची बायको आली की आमचं तिघांचं कुटुंब सुखात राहील यासाठी मी आशावादी राहीन. आणि दुर्दैवाने नाही झालं तसं, तर ...... अजून ९ वर्षं नोकरी आहे माझी शिल्लक. ती आधी पुरी करेन. ती करताना पर्याय शोधत राहीन.
त्या भीषण घटनेनंतर सतत झगडतेय मी. आत्ता १०-१२ वर्षांनी निवांत, कसली जबाबदारी नाही, कसली चिंता नाही असं आयुष्य वाट्याला आलंय ते हवंय मला. आत्ता दुसऱ्या लग्नाचा विचार करून आर्थिक, कौटुंबिक, भावनिक आणि .......... शारीरिकही ..... कसरत करण्याची तयारी नाही माझ्या मनाची. आणि हा निर्णय मी नीट विचार करून घेतला आहे. कुठल्याही भावनेच्या भरात नाही.
ऑफिसमध्ये एका कलीगनी मला लग्नाबद्दल विचारलं होतं एका मैत्रिणीच्या मध्यस्थीने. तेव्हाही मी शांत मनाने ठाम नकार देऊ शकले कारण माझा विचार करून झाला होता. मला माझं आयुष्य आता शांततेत, कुणाच्याही ताबेदारीविना जगायचंय. हा माझा पक्का निर्णय आहे.”
ती थांबली. पुन्हा पाणी प्यायली. पुन्हा शांतता. इतका वेळ गप्प ऐकणारी तिची जाऊ म्हणाली, “मला वाटतं, स्नेहाचं म्हणणं रास्त आहे. तिने एकटं राहू नये, तिला आपलं माणूस मिळावं असं आपल्याला वाटतं, पण तिला त्याची गरज आहे की नाही हे ठरवायचा अधिकार फक्त तिलाच आहे. ती काही परकरी पोर नाही. पुरेशी प्रगल्भ आहे. तिला कळतात तिच्या गरजा आणि त्या सांगायला संकोचायचं तिला काहीच कारण नाही. स्वत:चं सुख शोधायचा पूर्ण अधिकार आहे तिला आणि तिचं सुख कशात आहे हे ठरवायचा अधिकारही तिचाच आहे.”
उठून तिने स्नेहाला जवळ घेतलं. “स्नेहा, काळजी करू नको. तुला वेगळा काही विचार करण्याची गरज कधीच पडणार नाही. उमेश तशी वेळ कधी येऊ देणार नाही.”
उमेशने उठून आईच्या पायाशी बसून तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. इतका वेळ आवरलेलं पाणी त्याच्या डोळ्यांतून वाहायला लागलं. हुंदक्यांनी त्याचं अंग थरथरत होतं. स्नेहा फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली.
(संपूर्ण)
महत्त्वाचं काही - - -
एकटं जगणं सोपं नसतं. वाढत्या वयात तर जास्तच कठीण वाटतं. मन मोकळं करायला, सुख-दु:ख समजून घ्यायला कुणीतरी आपलं जवळचं हवं हे निखालस सत्य आहे. पण वाढत्या वयात नव्याने जोडीदार शोधणंही फारसं सहज सोपं नाही. माणसाच्या सगळ्या इच्छा, गरजा पूर्ण होतातच असं नाही. काही ठिकाणी गरज पुरी होण्यापेक्षा अभाव सोसणं बरं असंही असू शकतं. सध्या (वेगळ्या अर्थाने) गाजत असलेल्या एका मालिकेच्या संदर्भात खूप चर्चा वाचली, ऐकली. हा एक वेगळा विचार मनात आला, तो कथारूपाने मांडायचा प्रयत्न.
खूप छान..
ReplyDeleteयातल्या विचारांशी सहमत
नमस्कार
ReplyDeleteतुम्ही लिहलेली कथा , एक वेगळा विचार म्हणून आवडली.
माझा बोलकी लेखणी नावाचा WhatsApp ग्रुप आहे. त्यावर मी चांगले साहित्य वाचून पोस्ट करते.
त्या ग्रुप वर हि कथा वाचायला परवानगी द्याल का.