वृद्धाश्रम

 

वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे - हे वारंवार ऐकायला येतं अलीकडे. काही उत्तम नियोजन असलेल्या वृद्धाश्रमांबद्दल माहितीपर, जाहिरातपर लेखही छापून येतात वर्तमानपत्रांत. ही जर खरंच काळाची गरज असेल तर त्यावर सखोल विचार करून, त्याचं नीट नियोजन व्हायला हवं, ते मात्र होतांना दिसत नाही. त्याचे काही सरकारी निकष किंवा बंधनकारक नियम असल्याचंही कुठे काही वाचायला मिळत नाही.

 

वृद्धाश्रम शब्दाला आपल्याकडे थोडी करुणेची, नकारात्मक छटा आहे. परंपरेनुसार मुलांनी आई-वडील आणि घरातल्या इतर ज्येष्ठांचा सांभाळ करायचा हे ७०+ पिढीच्या मनात पक्कं ठसलेलं आहे. ६०+ पिढी काय योग्य हे पक्कं ठरवू शकत नाहीये अजून. आज जी पिढी ४०+ वयोगटात आहे, त्यांच्या विचारांत हळूहळू बदल होतायत. त्यांच्या स्वत:च्या आयुष्याबद्दलच्या कल्पना, प्राधान्यक्रम बदलतायत. त्यांना वेगळा विचार करावासा वाटतोय आयुष्याबद्दल. आणि म्हणूनच कदाचित वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांबद्दल एक कणव जाणवते बऱ्याच लोकांच्या बोलण्यात. मुलं विचारत नाहीत, आई-वडिलांना टाकलं, आईवडील नकोसे असतात हल्ली मुलांना असे अनेक मुद्दे चर्चेला. पण परिस्थिती नेहमी तशी नसते. अपवाद असतातच. चूक कुणाची, किती याची चर्चा इथे अप्रस्तुत ठरेल. पण एका मापाने सगळी माणसं मोजली जाऊ नयेत हे मात्र निश्चित.

 

कुणाची किती पैसे खर्च करायची ऐपत आहे, त्यावर वृद्धाश्रमांचा दर्जा ठरतो. अगदी पंचतारांकित सोयी पुरवणारे वृद्धाश्रमही आहेत. रिकाम्या खोल्या भाडं घेऊन ज्येष्ठ नागरिकांना २-४ दिवसांसाठी राहायला देतात बऱ्याच ठिकाणी. अशा काही वृद्धाश्रमात मी राहून आले आहे. लांबची सहल करणं प्रत्येक वेळी शक्य नसतं, असा छोटा हवाबदल पण कधी बरा वाटतो. काही ज्येष्ठांना मुलं नसतात. त्यांनी वृद्धाश्रमात राहावं हे ओघाने येतं. काहींची मुलं परदेशात स्थायिक असतात, अशांची वयं वाढली की घर चालवणं, सांभाळणं अवघड जायला लागतं. मग वृद्धाश्रमाखेरीज दुसरा सुरक्षित आणि सोयीचा पर्याय नसतो. एकदा एक बाई म्हणाल्या, माझी सून उच्च शिक्षित आहे, वरच्या हुद्यावर काम करते. पण बाहेर पडली की तिला घराची काळजी लागून राहायची. औषध घेतलं का, जेवलात का अशा चौकशा करत राहायची. गॅस नाही ना चालू राहिला चुकून, दार उघडं राहिलं का याची सतत काळजी वाटायची तिला. अखेर दिवसभराची आया ठेवायचा विचार केला. पण मग मीच म्हटलं, त्यापेक्षा आम्ही वृद्धाश्रमात जातो. कारण पुन्हा ती आया बरी असेल का याची काळजी आहेच. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडतांना मन स्वस्थ नको का राहायला तिचं. आम्ही आलो इथे. वर्षातून दोनदा जवळपास कुठे छोट्या सुटीला जातो आम्ही एकत्र, सणावाराला घरी जातो. ठीक चाललंय. अर्थात अशी समजूत अगदी दुर्मिळ. 

 

काही ना काही अगतिकता असल्याशिवाय माणसं घर सोडून वृद्धाश्रमात राहायला जात नाहीत. एका परिचितांच्या निमित्ताने हा विषय डोक्यात अगदी आत घुसला. त्यांना भेटायला गेलो तेव्हा तिथे जे दिसलं ते पाहून अस्वस्थ वाटलं. एकटी राहणारी ही माणसं, कुणी आस्थेने बोललं, विचारपूस केली की अगदी भरभरून बोलत सुटतात. किती बोलू, काय करू असं होतं त्यांना. अगदी फार मोठी माणसं नसली तरी त्यांच्याही गाठीला आयुष्याचे ४ अनुभव असतात. ते कुणाशी तरी बोलावे, आपली कुणी तरी दखल घ्यावी, आपण अगदी भुईला भार नाही हे दाखवून द्यावं यासाठी अगदी जीवाचा आटापिटा करतात. आपल्याला कुटुंबाने नाकारलंय किंवा आपण अगदी एकटे आहोत, आपल्याला कुणी मागे-पुढे नाही याची जखम लपवण्याचा केविलवाणा आटापिटा चालू असतो. जे वृद्धाश्रम निम्न आर्थिक गटांसाठी चालवले जातात, तिथे राहणाऱ्या त्या परिचित गृहस्थांनी एकदा म्हटलं, “लोक घरातल्या काही कार्यानिमित्त मिष्टान्न पाठवतात, कुणाच्या श्राद्धपक्षानिमित्त जेवण देतात. घशाखाली घास नाही उतरत. भिकाऱ्याची कळा आलीय असं वाटतं. फार पैसे नसले गाठीला तरी असं दयेवर जगण्याची वेळ नाही आलेली ...  काय बोलणार!

 

आमच्या लहानपणी 'दो या तीन बच्चे, होते हैं घरमें अच्छे' ही घोषणा लोकप्रिय होती. माझं लग्न होईपर्यंत 'हम दो, हमारे दो' आलं. नंतर एकच पुरे. आणि अलीकडे तर एकच पुरेवरून DINK (double income, no kids) वर गाडी आलीय. हे एकच मूल जेव्हा लग्न करून संसारात पडतं तेव्हा काय होतं? जोडीदार पण आपल्या आई-वडिलांचं एकुलतं मूल असेल तर आई-वडिलांच्या म्हातारपणाची जबाबदारी घेण्याला दोघांनाही पर्याय नसतो. मग कुणाच्या आई-वडिलांनी एकटं राहायचं आणि का? सगळी एकत्र राहिली तर त्या तरुण जोडप्याच्या संसाराचा वृद्धाश्रम होईल. सगळ्यांनाच मन मारून राहावं लागेल. उभं आयुष्य प्रपंचाच्या तडजोडी करण्यात घालवलेल्या ज्येष्ठांना उतरत्या वयात थोडं तरी आपल्या मर्जीने जगावंसं वाटलं तर ते तरी चूक कसं म्हणता येईल? मग केवळ मुलांची सोय म्हणून विळ्या-कोयत्याची मोट बांधण्यात काय हशील? मग उपाय काय? एका तरुण जोडप्याने घेतलेला निर्णय ऐकून कळ आली उरात. किती मोठं ओझं असेल त्यांच्या मनावर! त्यांनी एका उत्तम वृद्धाश्रमात एक खोली कायम स्वरूपी घेतली. आणि दोघांचे आई-वडील आळी-पाळीने तिथे राहतात. हे घरी तेव्हा ते वृद्धाश्रमात. सणाच्या दिवशी वृद्धाश्रमातले आई-वडील २ दिवसांसाठी घरी. पण निदान कुणीच कायम एकटं राहू नये याची शक्य ती तजवीज करण्यातली कळकळ तरी दिसली. मोठं घर घेऊन एकत्र राहण्यात काही अडचणी असतील म्हणून नाईलाजानेच हा निर्णय घेतला असेल हे उघड आहे. ज्यांची मुलं परदेशात असतात त्या पालकांचे आणखी वेगळे प्रश्न. दिवसेंदिवस फार जटिल होणार आहे ही समस्या. आणि दोन अधिक दोन बरोबर चार इतकी सोपी नसणार आहेत याची उत्तरं. कितीतरी शक्यता, समान परिस्थिती, भिन्न जीवनशैली, या सगळ्यांचा स्वतंत्र विचार करून उत्तरं शोधावी लागतील. अगदी customized product म्हणतात तशी.

 

जिथे पैसे देऊन उत्तम सोयी मिळतात, तिथेही फारसा आनंद दिसला नाही. साहजिकच नाही का ते. एकतर शहरातले जागांचे भाव परवडत नाहीत म्हणून असे वृद्धाश्रम गावाच्या बाहेर असतात. तिथे राहणारे सगळेच ज्येष्ठ-म्हातारे. काम करणाऱ्या सेवक वर्गाखेरीज कुणी तरूण नजरेला पडत नाही. काही किरकोळ गरज असली तरी ते या सेवक वर्गाला सांगून मागवून घ्यायचं. समवयस्कांचा सहवास अशी कितीही गोड चित्रं लेखांतून, जाहिरातीतून रंगवली असली तरी मिश्र वयोगटात असणारा उत्साह, तरुणाई भोवती असताना जाणवणारं चैतन्य तिथे नसतं. कुणाची काही दुखणी, कुणाची काही इतर व्यथा हेच दिसत राहतं सदोदित. समाजात मिसळण्याची दारं अगदी बंदच होतात. अलीकडे ७०-७५ वयातही माणसं तरतरीत, उत्साही असतात. सिनेमा-नाटक, बाहेर जेवण, संध्याकाळी जवळपास हलकी रपेट करायची इच्छा-हौस जागी असते. पण गावाबाहेर राहिलं की हे नाही शक्य होत. बाहेर पडलं तरी जाणार कुठे?

 

आता मोठ-मोठी गृहसंकुलं बांधण्याकडे कल वाढतोय. निम्न आर्थिक गटासाठी ठराविक सदनिका राखून ठेवणं बंधनकारक केलं आहे अशा संकुलांत. त्याच धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशस्त, स्वयंपूर्ण खोल्या बांधल्या तर ते सोयीचं ठरेल असं मला सतत वाटतं. विकत द्याव्या की एखाद्या संस्थेला नियोजन सोपवून भाड्याने द्याव्या ते आपापल्या सोयीने ठरवतील संबंधित. मोठ्या संकुलात सगळे वयोगट भोवती असतील. वातावरण उत्साही असेल. वेगवेगळे उपक्रम होतील. प्रकृतीने चांगले असलेले ज्येष्ठ, इतर ज्येष्ठही आपापल्या तब्येती सांभाळून त्यात सहभागी होऊ शकतील. विद्यार्थी वर्गाला कुणी काही अभ्यासाचे विषय, काही कला प्रकार, शिकवू शकेल. गरजेला जवळपास आपलं आपण जाऊ शकतील, सतत कुणावर अवलंबून राहावं लागणार नाही. निवृत्त जीवन जगतांना समाजापासून तुटून पडण्याची भीती राहणार नाही. घर मांडून राहताना ज्या जबाबदाऱ्या असतात त्या घ्याव्या लागणार नाहीत, खऱ्या अर्थाने स्वच्छंदी, निवांत जगता येईल. ही फक्त एक सहज मनात आलेली कल्पना आहे. पण असं काही करायचं ठरवलं तर सर्व संबंधितांना एकत्र बसून जास्तीत जास्त निर्दोष योजना आखता येईलच. ज्यात सधन, मध्यमवर्गीय, कनिष्ठ आर्थिक वर्ग सगळ्यांसाठी काहीतरी आशादायी असेल.

 

मनासारखं नाही तरी किमान आनंद आणि निवांतपणा मिळेल असं निवृत्त जीवन ही ज्येष्ठांची महत्त्वाची गरज आहे हे कुणीही मान्य करेल.

Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न