वहिवाट
- Get link
- X
- Other Apps
#वहिवाट
सकाळचे साडेनऊ वाजून गेले होते. राघव आणि मृणालिनी नाश्ता उरकून ऑफिसमध्ये गेले. बंगल्याच्या आऊटहाऊसमध्येच राघवचं वकिलीचं आणि मृणालचं इंटिरीअर डिझाईनिंगचं ऑफिस होतं. मृणालनेच माळा काढून छान रचना करवून घेतली होती. जायचा-यायचा वेळ वाचायचा, जेवण एकदम घरी येऊन निवांत व्हायचं. दुपारी थोडा आरामही व्हायचा. मुलं घरी यायच्या वेळी मृणाल थोडा वेळ घरी येऊन पुन्हा ऑफिस किंवा बाहेर कुठे काम असलं तर तिथे जायची. चंद्राबाई आता स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. वरकामाची सखूबाई येऊन तिच्या कामाला लागली. नीलिमाबाई स्वस्थपणे पेपर घेऊन व्हरांड्यात आल्या आणि तिथल्या झोपाळ्यावर टेकून मुख्य बातम्यांवर नजर फिरवायला लागल्या.
अचानक फाटकाशी काही हालचाल जाणवली. पेपर टाकून नीलिमाबाई कठड्याशी आल्या आणि किंचित जोरात म्हणाल्या, “कोण आहे बाहेर?” पलिकडे कुणाच्या तरी घरी काम चालू होतं, त्यांच्या कामगारांची मुलं एक-दोनदा शिरली होती बागेत, फुलं काढायला. पण कुणीच पुढे येईना, तसं त्यांनी पुन्हा जोरात हाकारलं, “कोण आहे?” आता एक म्हातारा हळूच पुढे आला. दाढीचे खुंट वाढलेले, मळका-चुरलेला ढगळ सदरा, दहा ठिकाणी मुरड घातलेलं धोतर, कळकट टोपी आणि चेहऱ्यावर पराकोटीचे लाचार भाव. त्याच्यामागून बहुधा त्याची बायको. त्याच्यासारखीच. दंड लावलेलं काठपदराचं लुगडं, मोठ्ठी चिरी, डोक्यावर पदर आणि हातात बोचकं. त्याला पाहून नीलिमाबाईना एकदम धस्स झालं. “गजानन? तू काय करतोयस इथे? आता काय राहिलंय? जा बाबा, आता नवा काही ताप नकोय आमच्या डोक्याला.” घाईने पेपर उचलून त्या घरात आल्या. मागे दार ओढून घ्यायला विसरल्या नाहीत. चंद्राबाई आणि सखूबाई खिडकीतून डोकावून बघत होत्या, कोणाशी बोलल्या वहिनी. “जा गं, सखूबाई. गेट नीट लावलंय की नाही ते बघ जा.” सखू जाऊन कडी नीट करून आली. गजानन आणि भामेचा चेहरा पडला. डोळ्यात पाणी तरळलं. एकवेळ या बंगल्यात हक्काने वावरत असत दोघं. रूबाबात चहा-पोळी खात असत या वेळी. आज भिकाऱ्यासारखे हाकलले जात होते. क्षणभर घोटाळले, पण माहित होतं – हे गेट आता कधी उघडणार नव्हतं त्यांच्यासाठी. जड पावलाने दोघं रस्त्याला लागली.
नीलिमाबाईंना पण क्षणभर वाईट वाटलं. यांच्या जीवावर घर सोडून आपण बाहेरगावी सुद्धा जात असू एके काळी. आज आपण आतही नाही येऊ दिलं त्यांना. पण काय करणार, बुद्धी फिरली त्यांचीच. आपल्या हाताने त्यांनी करून घेतलीय ही दशा. त्या एकदम चमकल्या. असे भिकाऱ्यासारखे का आले होते दोघे? भामाबाई नेहमी कशी टेचात असायची. आज अगदीच दीनवाणी झाली होती. मान झटकून त्यांनी विषय झटकायचा प्रयत्न केला, पण आठवणी पाठ सोडेनात.
हे घर बांधलं विजयरावांनी, तेव्हा नुकतीच कॉलनी उभी राहत होती. २०० बंगले व्हायचे होते एकूण. त्यांच्या घराच्या काँट्रॅक्टरनेच गजाननला आणला होता. “माझा गाववाला आहे. विश्वासू आहे आणि हिरव्या हातांचा आहे बघा. अशी फुलवेल बाग तुमची, सगळ्या कॉलनीत तशी कुणाची होणार नाही. आणि ही त्याची बायको भामाबाई. ही घरात मदत करेल वहिनींना. कामाला वाघ आहेत दोघं आणि इमान असं की मान कापून देतील पण इमान नाही सोडणार.” विजयरावांनी ठेवून घेतलं आणि आऊटहाऊसमध्ये बिऱ्हाड थाटायला जागा दिली. दोघं अगदी विरघळली घरात. नीलिमाबाईंना कधीही काहीही अडचण जाणवलीच नाही. प्रत्येक ठिकाणी गजा आणि भामाबाईच्या जोरावर त्या सुरळीत सगळे व्यवहार पार पाडायच्या. त्यांचा मुलगा सर्वेश तेव्हा दीड वर्षांचा होता. दिवसभर आईच्या मागे मागे करायचा. राघव शाळेतून आला की त्याच्या मागे असायचा. नवसाचा होता, लग्नानंतर बारा वर्षांनी झाला होता. जरा अतिच लाड करायची भामाबाई. नीलिमाबाई हटकायच्या, “अगं, बिघडेल, वाया जाईल अशाने. जरा ओरड त्याला.” पण ती हसून दुर्लक्ष करायची. पण जसा शाळेत घातला, तसे गुण दिसायला लागले त्याचे. मारामाऱ्या तर रोजच्या. किती पाट्या फोडल्या आणि किती पुस्तकांच्या चिंध्या केल्या, हिशेबच नाही. विजयराव न बोलता गजानन आणि भामाबाईच्या कामाकडे बघून पुन्हा पुन्हा आणून द्यायचे पाटी-पुस्तकं. नीलिमाबाई तक्रार करायच्या, हसून सोडून द्यायचे. दहावी काही झेपली नाही सर्वेशला. राघव कितीदा म्हणायचा, “अरे, रात्री मी बसतो अभ्यासाला. तू येत जा माझ्याबरोबर. मी शिकवेन काही अडलं तर.” पण बऱ्याचदा राघवचे मित्र असायचे, त्यांचे जोरात चर्चा-वाद चालायचे. मग सर्वेश नाही यायचा. राघव वकील होऊन मोठ्या फर्ममध्ये जायला लागला तरी हा दहावीतच घुटमळत होता. मग राघवनेच आपल्या ओळखीने एका मोठ्या बिल्डर फर्ममध्ये त्याला लावून दिला. अभ्यासात गति नव्हती, पण धंद्याची गणितं लवकर शिकला सर्वेश. ऑफिसात येणाऱ्या सप्लायर्स, छोट्या काँट्रॅक्टर्सच्या ओळखी करून घेऊन इकडचं काम तिकडे, तिकडचं तिसरीकडे – थोडक्यात चक्क दलाली सुरू केली त्याने नोकरीबरोबर. जसा पैसा खेळायला लागला हातात, गुर्मी आली त्याच्या वागण्या-बोलण्यात. विजयरावांसमोर दबून असायचा, पण नीलिमाबाई आणि राघव यांचं बोलणं सरळ झटकून टाकायचा. चिडायचा राघव. “बाबा, हा सर्वेश जरा चढलाय हं. गजाकाकाला सांगा, समजाव म्हणावं त्याला जरा.” विजयरावांनी गजाला काही सांगितलं की तो हात जोडायचा, काहीबाही कारणं सांगायचा. मग ते तेवढ्यावरच राहायचं.
विजयरावांच्या अचानक मृत्यूनंतर त्याचा उर्मटपणा वाढायला लागला. आपल्याला कुणी काही विचारू शकत नाही, बोलू शकत नाही अशा थाटात वावरायला लागला. दुरूत्तरं तर रोजचीच. एक दिवस त्याने गजानन आणि भामाबाईला बंगल्यात कामाला जायला बंदी केली. मग मात्र राघवचं डोकं फिरलं. “गजाकाका, तू आणि भामाकाकू आमच्याकडे काम करत होतात, म्हणून बाबांनी तुम्हाला ही जागा वापरायला दिली होती. आता तुम्ही काम करत नाही, तर जागा सोडा.”
“आरं दादा, कुठं जाणार आमी?” पण राघव हट्टाला पडला होता. सर्वेशचा तोरा उतरवायचाच होता त्याला. त्याने रीतसर नोटीसच दिली. सर्वेशने पण वकील केला. वहिवाट सांगितली. शाळेचे, नोकरीचे कागद दाखवले. आपण किती वर्षं इथे राहतो ते सगळ्या कागदोपत्री पुराव्यानिशी कोर्टात दाखवून दिलं. राघव स्वत: यशस्वी वकील असून काही करू शकला नाही. गजाची वहिवाट त्याला नाकारता आली नाही. पण हायकोर्टात मात्र त्याची बाजू न्यायाधीशांना पटली. गजा जर आता त्या घरात काम करत नाही, तर त्याची राहायची सोय करायला राघव जबाबदार नाही. तेव्हा सर्वेशने ते घर सोडावं आणि राघवने त्याला दहा लाख रूपये द्यावे, नवीन घर घेण्यासाठी. राघवने काहीही खळखळ न करता हा निर्णय मान्य केला. कारण आता त्याला स्वत:ची स्वतंत्र प्रॅक्टिस करायची होती आणि लग्नानंतर मृणाललाही तिच्या ऑफिसकरता जागा लागलीच असती. नवीन जागा काही दहा लाखात आली नसती. तेव्हा हा निकाल त्याला तोट्याचा मुळीच नव्हता. राघव पैसे द्यायला सहज तयार झाला म्हटल्यावर सर्वेशच्या डोक्यात किडा आला. काहीतरी फायदा असल्याशिवाय राघव हे मान्य करणार नाही, हे त्याच्या लक्षात आलं. पण काय ते कळेना. चार वकिलांना भेटून, फीया देऊन, डोकं फोडूनही सर्वेशला काही मार्ग दिसेना, राघवचं काय चाललंय ते कळेना. तेव्हा राघवने दिलेले दहा लाख रुपये घेऊन तो निघून गेला. नीलिमाबाईंनी भामाबाईला साडीचोळी केली. कुंकू लावून घे म्हटलं. मागे वळूनही न बघता ती गेली, ती आज इतक्या वर्षांनी आली समोर. अशी भिकाऱ्यासारखी.
३-४ वर्षं कोर्टाच्या फेऱ्या, ताण यांनी नीलिमाबाई थकून गेल्या होत्या. रोज डोळ्यासमोर दिसायची दोघं, कळ उठायची काळजात. पण बुद्धी फिरली माणसाची, तर त्याला काय भान बऱ्या-वाईटाचं. आपला मुलगा कसा हुशारीने वागतोय याचंच अपार कौतुक वाटत होतं त्यांना. खाल्ल्या मीठाची काही आठवणच नव्हती.
संध्याकाळी राघवला त्यांनी काही सांगितलं नाही गजा येऊन गेल्याचं. उगाच तो पुन्हा चिडायचा. पण रात्री कितीतरी वेळ झोप नाही आली त्यांना. सारखं त्या दोघांचं ते दीन रूप नाचत राहिलं डोळ्यासमोर. “उद्या परत आला तर? काय करायचं?” या विचाराने त्या अगदी अस्वस्थ झाल्या.
दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे ती दोघं येऊन उभी राहिलीच. नाईलाजाने त्यांनी सखूबाईला गेट उघडून त्यांना आत घ्यायला सांगितलं. व्हरांड्यात बसून दोघांनी चहा-पोळी खाल्ली आणि दीन चेहरा करून बसून राहिली. नीलिमाबाई जरा कोरडेपणे म्हणाल्या, “आता काय? कशाला माझ्या दारात?” त्यावर भामाबाईंनी सांगितली सगळी कहाणी. राघवने दिलेले पैसे घेऊन ती सगळी गेली, ती गावात एका चाळीत खोली घेऊन बिऱ्हाड थाटलं. सर्वेश घरचं सगळं बघत होता. गजाकाका एका कंपनीत माळी म्हणून रोजंदारीवर लागला. नीट चालू होतं. कुणा काँट्रॅक्टरने सर्वेशला आपला जावई करून घेतला. दोन नातवंडं झाली. आणि एक दिवस सर्वेश काहीतरी गैर व्यवहार करतांना सापडला. त्याची दलाली अंगाशी आली. नोकरी गेली. होती-नव्हती ती शिल्लक कोर्ट केस, वकील यात गेली. खोली गहाण पडली. उपास घडायला लागले. गेल्या आठवड्यात खोली विकून, देणी फेडून सर्वेश बायको-मुलं घेऊन तिच्या माहेरी गेला. ही दोघं काही गेली नाहीत. एकतर आपल्या मुलाने गुण उधळून ही गत करून घेतल्याचा अपराधीपणा आणि गावकी-भावकी काय म्हणेल हा धसका. ४-६ दिवस स्टेशन, स्टँड, इकडे-तिकडे काढले. अखेर निरुपाय होऊन इथे आले होते.
“वयनी, माणसाला केल्या पापाचं माप हितंच फेडाया लागतंय बगा. काय करावं कळंना, तवा आलो. तुमी ...” बोलता बोलता गजा थांबला. नीलिमाबाई स्तब्ध ऐकत होत्या. उठून आत जाऊन त्यांनी आपल्या कपाटातून ५००० रुपये काढून आणले.
“गजा, तुझं जुनं ऋण राहिलंय असं समजून हे देतेय. गावी जा किंवा इथेच काही काम सुरू करा. पण इथे नाही आता तुमची सोय होणार. राघव ऐकणार नाही आणि राहणार कुठे तुम्ही? तेव्हा हे पैसे घेऊन निघावंस हे बरं.”
पैसे उचलून गजानन आणि भामाबाई बाहेर पडले. पुन्हा एकदा मागे वळून न बघता निघून गेले. इथला घास संपला होता आणि दयेची वहिवाट नसते, कोर्टात दाद मागायला.
राधा मराठे
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment