यशस्विनी
टाळ्यांच्या कडकडाटात वैदेही सत्कार स्वीकारायला
उठली आणि तिने पहिल्या रांगेत बसलेल्या जावेला – अस्मिताला खुणेने व्यासपीठावर
बोलावलं. ती गोंधळली. बाजुला उभ्या असलेल्या स्वयंसेविका चटकन् पुढे झाल्या आणि
अस्मिताला हाताला धरून वर घेऊन गेल्या. दोघींनी मिळून फुलांचा गुच्छ आणि
भेटवस्तूचा खोका स्वीकारला. घाईने मांडलेल्या खुर्चीवर अस्मिताला बसवलं गेलं.
निवेदकाने म्हटलं, “श्रीमती वैदेही यांना मी विनंती करतो की त्यांनी
त्यांचे अनुभव सांगावे.”
वैदेही उभी राहिली. संथ स्वरात आणि ठामपणे,
स्पष्ट शब्दांत तिने बोलायला सुरूवात केली. “यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते हे आपल्याला माहीत आहे. य़शस्वी
स्त्रीच्या मागे एक पुरूष असतो हेही आता नवीन नाही राहिलेलं आपल्यासाठी. पण माझी
यशोगाथा सांगते की यशस्वी स्त्रीच्या मागे एक स्त्रीही असते. माझ्या कथेत ती
स्त्री म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई अस्मितावहिनी आहेत. अगदी नि:संशयपणे.
पदव्युत्तर शिक्षणासाठी ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती वृत्ती मिळावी म्हणून मी गेली ५ वर्षं प्रयत्न करत होते. प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने ती मला
हुलकावणी देत होती. आणि दोन वर्षांपूर्वी जेव्हा खरोखर ती मिळाली, तेव्हा माझं बाळ
२ महिन्यांचं होतं. अशा नाजूक वेळी आलेली संधी ही संधी म्हणावी की आव्हान असा
प्रश्न पडला मला. घरात चर्चांचं मोहोळ उठलं. सासूबाई, मोठे दीर आणि नवऱ्याने अपेक्षित
उत्तर दिलं. – तू पूर्ण विचार केल्याशिवाय घाईने निर्णय घेणार नाहीस असा आम्हाला
विश्वास आहे. तू जे ठरवशील ते आम्हाला मान्य आहे. आता मी खरंच संकटात सापडले.
इतक्या प्रतीक्षेनंतर चालून आलेली संधी घालवायची तर आयुष्यभर खंतावत राहायचं आणि
ती घ्यायची तर बाळ लहान. अशात एक दिवस माझ्या जाऊबाई आल्या माझ्याजवळ आणि
म्हणाल्या – स्वीकार ही संधी. नि:शंक मनाने जा. माझं
तिसरं मूल समजून सांभाळेन मी बाळाला. काळजी नको करू. आणि आता इतक्या सोयी आहेत, तू
बघू शकशील की त्याला तुला हवं तेव्हा. – बरंच समजावलं त्यांनी मला आणि त्यांच्या
भरवशावर मी ती संधी घेतली. २ महिन्यांनी माझं बाळ त्यांच्या ओटीत सोपवून मी २
वर्षांसाठी परदेशात गेले. जाताना ठरवलं होतं की रात्रीचा दिवस करून अभ्यास करायचा
आणि शक्य तितक्या लवकर परत यायचं.
पण वाटलं होतं तितकं सोपं नव्हतं असं एकटीने लांब
राहून अभ्यासात मन एकाग्र करणं. बाळाच्या आठवणीने रडू फुटायचं कित्येकदा. आणि तो
तर दिसत नव्हता. वेळा वेगळ्या दोन्हीकडच्या. जेव्हा तो खेळत असायचा तेव्हा मी
झोपलेली आणि मला वेळ असायचा तेव्हा तो झोपलेला. मग कधी रात्री जागून ५-६ मिनिटांचा
कॉल व्हायचा. पण तो एका जागी बसायचाच नाही. मग दर दोन दिवसांनी जाऊबाई त्याचे
व्हिडीओ पाठवायच्या, फोटो तर किती तो आकडा सांगताही येणार नाही मला. हळूहळू रुळले
आणि अभ्यासाला गती आली. परत यायला आठ दिवस राहिले, तेव्हा एकदा अस्मितावहिनी
एकट्या माझ्याशी बोलल्या. म्हणाल्या - बाळ आता मोठा झालाय. माणसं ओळखतो. तुझे फोटो
बघतो, आई कुठे म्हटलं की फोटो दाखवतो. पण प्रत्यक्ष तू समोर आलीस की कदाचित बुजेल,
तुझ्याकडे लगेच झेप घेणार नाही. दु:खी होऊ नको. त्याला
थोडा वेळ घेऊ दे तुला ओळखायला. मनाची तयारी कर की बाळ लगेच तुला ओळखणार नाही, एकदम
निराश होशील म्हणून सांगतेय मुद्दाम. – मी अगदी ह़डबडून गेले. बाळासाठी वेळेआधी ६
महिने मी अभ्यास पूर्ण करून मी घरी जाणार होते आणि तोच मला ओळखणार नाही असं झालं
तर .......
एव्हाना माझी रुम पार्टनर माझी अगदी चांगली
मैत्रीण झाली होती. तिने मला समजावलं. वहिनी कसं बरोबर बोलतायत ते सांगितलं. –
तुझ्या देशात कुटुंब व्यवस्था इतकी बळकट आहे ही किती चांगली गोष्ट आहे. इतकं छोटं
बाळ सांभाळायची जबाबदारी घेतली तुझ्या कुटुंबाने, हे अगदी दुर्मिळ आहे. आमच्याकडे
नाही कुणी घेणार अशी जबाबदारी..... – असं काहीबाही बोलत राहिली. मी जरा स्थिर
झाले, शांत होत गेले. विचारांती मलाही वहिनींचं म्हणणं पटलं.
आणि परत आल्यावर खरंच बाळाने माझ्याकडे यायला साफ
नकार दिला. काकूच्या कडेवर बसून माझ्याकडे बघत राहिला, पण कडेवर घ्यायला मी हात
पुढे केले तर चक्क मान फिरवलीन. काही मिळवायचं असेल तर काही गमवावं लागतं याचा खरा
अर्थ मला तेव्हा कळला. अतिशय प्रतिष्ठेची पदवी आणि शिष्यवृत्ती मला मिळाली खरी, पण
त्यासाठी माझ्या बाळाच्या बाळलीला डोळे भरून बघण्याचा आनंद मी गमावला. आणि आता तर
तो माझ्याकडे बघायलाही तयार नव्हता.
पण मी मन आवरलं. आणि खरंच १० दिवसांत तो मला
ओळखायला लागला. फोटोत दिसणारी आई हीच हे त्याने स्वीकारलं. हळूहळू आमचं गाडं
रुळावर आलं.
माझ्या जाऊबाईंचे
आभार मी मानणार नाही, त्यांच्या ऋणात राहण्यात माझा आनंद आहे.”
नंतर वैदेहीने तिच्या अभ्यासाविषयी काही
महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, काही ठळक आणि महत्त्वाचे अनुभव ऐकवले
श्रोत्यांना. तिच्या यशाची दखल घेऊन तिचं कौतुक केल्याबद्दल स्थानिक रोटरी शाखा
आणि इतर काही सहयोगी संस्थांचे आभारही मानले.
समारंभ संपवून मंडळी घरी निघाली. गाडीत बसताना
अगदी अनपेक्षितपणे सासूबाईंच्या कडेवर असलेल्या बाळाने तिच्या अंगावर झेप घेतली आणि
गळ्यात हात टाकून गोड हसला. जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर स्मित फुललं आणि वैदेही
.....
नवऱ्याने गाडीचं दार उघडलं होतं, बाळाला छातीशी घट्ट
कवटाळून ती गाडीत बसली. तिचा चेहऱा समाधान, अभिमान, ममता आणि कृतज्ञता या सगळ्या
भावनांच्या अनोख्या मिश्रणाने विलक्षण चमकत होता.
Comments
Post a Comment