निवड
१ तारखेला सकाळी पगार जमा झाल्याचा बँकेचा
मेसेज आलेला दिसला आणि सायली त्या पाच आकडी संख्येकडे डोळे भरून बघत राहिली.
पदवीधर झाल्यापासून गेली दोन वर्षं ती नोकरी करत होती, पण पगार चार आकडी
संख्येतच थांबला होता. कंपनी तशी छोटी असल्यामुळे तो वाढण्याची संधीही फार कमी
होती. पण मालकांनी तिला एम.बी.ए.चे क्लासेस करण्यासाठी सकाळी लवकर येऊन संध्याकाळी
लवकर जाण्याची परवानगी दिली होती, म्हणून ती तिथे टिकून राहिली होती. एम.बी.ए.चा रिझल्ट लागल्याबरोबर
तिने मोठ्या कंपन्यांत अर्ज करण्याचा सपाटा लावला होता. २-३ महिन्यांत तिला एका
मोठ्या कंपनीत नोकरी मिळालीही होती. आणि आज पहिला पगार .... तिचा आनंद मनात
मावेना. तिने धावत जाऊन आईला ही बातमी सांगितली, मेसेज वाचूनही दाखवला. आईने कौतुकाने देवापुढे
साखर ठेवली. तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून म्हणाली, “आता शनिवारी बाजारात जाऊन ४ मनाजोगे कपडे, पर्स आणि इतर ४
गोष्टी घे तुझ्यासाठी. फार कष्ट केलेस अभ्यासाचे. जरा हौस कर आता.” आईचे शब्द ऐकून ती
भरून पावली. आईला न सांगता तिचं मन कळायचं नेहमीच. फार कधी बोलायची नाही ती. पण
अशी नेमकं बोलायची कधीतरी, आणि सायलीचं मन भरून जायचं आनंदाने.
सायलीचा हात आता हळूहळू थोडा सैल झाला.
हौसेची एखादी नवी वस्तू घेतांना फार जास्त विचार नाही करावा लागायचा. २-३ महिने
हौस केल्यावर मात्र आईने तिला हटकली. “थोडा बचतीचा विचार कर आता सायली,
राखून ठेवावं थोडं बाजुला. लग्न कार्य व्हायचंय
तुझं. कामी येतील पैसे.” सायलीने ऑफिसमधल्या मैत्रिणींशी सहज बोलता बोलता अंदाज घेतला होता, कसे-कुठे पैसे
गुंतवले तर फायदा चांगला मिळतो, हातात ४ पैसे लगेच येतात अडचणीच्या वेळेला. तिने विचार करून ठेवला
होताच, काय करायचं त्याचा. पुढच्या दोन-तीन महिन्यांत सायलीची नोकरी, पगार, बचत सगळं मार्गी लागलं.
आता तिच्या आई-बाबांना तिच्या लग्नाचे वेध
लागले. तिच्या ताईचं लग्न होऊन ४ वर्षं होऊन गेली होती. तिला शिकायची वगैरे फारशी
आवड नव्हती. पदवीधर झाल्याबरोबर तिच्या योग्य स्थळ पाहून तिचं लग्न उरकून घेतलं
होतं त्यांनी. पण सायलीला शिकायचं होतं, ४ पैसे गाठीला लावायचे होते. तिची छोटी, तिच्यापुरती का होईना, काही स्वप्नं होती.
आता हळूहळू सगळं तिच्या मनासारखं होत होतं. सायली म्हणाली, “आई, मला परमनंट तर होऊ
दे. जरा हिंडू दे ना. घाई काय आहे? इतकं काही वय वाढलं नाहीये माझं.” वर्षभर थांबायचं असं ठरलं.
सायली तशी दिसायला बरी होती. आता ४ पैसे
खेळत होते हातात. चांगले कपडे, हलका मेकअप, वागण्या-बोलण्यातली सफाई आणि आत्मविश्वास याने ती उठून दिसायला लागली
४ मुलींत. लवकरच ती परमनंटही झाली. वर्ष झालं नोकरी लागून, तेव्हा तिने
ऑफिसमधल्या २-४ मित्र-मैत्रिणींना छोटी पार्टी दिली. एकंदर खुशीत होती सायली.
एक दिवस तिच्या बरोबर काम करणाऱ्या
देसाईकाकांनी तिला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बाहेर कॉफी प्यायला बोलावलं आणि
तिच्यासमोर मॅनेजिंग डायरेक्टर भिसेंच्या मुलाशी लग्न करायचा प्रस्ताव मांडला. ते
वर्षभर तिला बघत होते आणि सून म्हणून ती त्यांना अगदी पसंत होती. देसाईकाकांच्या
मार्फत त्यांनी निरोप दिला होता की तिने त्यांच्या मुलाला २-४ वेळा भेटावं आणि
तिचा होकार असेल तर ते घरी येऊन रीतसर मागणी घालतील. सायली चकीत झाली. हे असं काही
होईल असं कुणाच्याही मनात कसं येईल! देसाई काका बोलत होते आणि ती फक्त ऐकत होती.
नरेन भिसे इंजिनियर होता, परदेशातून शिकून आला होता आणि आता एका मोठ्या मल्टि नॅशनल कंपनीत
वरच्या हुद्द्यावर काम करत होता. घर, गाडी, बँक बॅलन्स सगळं होतं. पण म्हटलं तर फक्त एक डाग होता. अमेरिकेत
असताना तिथे त्याचं एका अमेरिकन मुलीवर प्रेम जडलं होतं. लग्नही केलं होतं त्याने.
पण नंतर नाही पटलं. वेगळा झाला आणि नोकरी सोडून परत आला. पण शिक्षण आणि तिथला
अनुभव यांच्या जोरावर इथेही त्याला चांगली नोकरी मिळाली लगेच. आता तो सावरलाय आणि
लग्न करायलाही रूकार दिलाय त्याने. “मी विचार करते.” इतकंच म्हणाली ती.
दोन दिवसांनंतर संध्याकाळी घरी आली, तर चहाचे
कप-खाण्याच्या बशा आवरत होती आई.
“कोण आलं होतं गं?” या तिच्या प्रश्नावर आई फक्त हसली. कपडे बदलून आली तर आई जणू तिची
वाटच बघत असल्यासारखी म्हणाली, “सायली, इनामदार काकू आल्या होत्या.”
“अशा अचानक मध्येच? खूप दिवसांनी आल्या ना. चाळ सोडून गेल्या तेव्हा तर सारख्या यायच्या.
चैन पडत नाही म्हणायच्या ब्लॉकमध्ये.”
“खास कामासाठी आल्या होत्या.”
सायलीने फक्त भुवया उंचावून पाहिलं.
आई सरसावून बसली. आणि तिचं बोलणं ऐकून
सायली थक्क झाली. इनामदार काकूंनी तिला गिरीशसाठी मागणी घातली होती. ३ चाळींच्या
त्या छोट्या संकुलात १५० कुटुंबं राहत होती. त्यामुळे कितीतरी मुलं-मुली एकत्र
खेळत मोठी झाली होती. लव्ह मॅरेज हा प्रकार तर मुळीच नवा नव्हता तिथे. एकाच मजल्यावर, खालून वर, वरून खाली, या चाळीतून त्या
चाळीत - वर्षाला २-३ तरी लग्न होऊन मुली नवी नवरी म्हणून तिथेच यायच्या मिरवत.
मुलं चांगली शिकली, कमवायला लागली असे काही जण चाळ सोडून स्वत:चा ब्लॉक घेऊनही राहायला
लागले होते. इनामदार असेच ३-४ वर्षांपूर्वी गेले होते चाळ सोडून. त्यांचा गिरीश
बँकेत लागला होता, बँकेचं कर्ज सहज मिळालं होतं त्याला. आणि इनामदार काकांना गावच्या
इस्टेटीचा वाटाही मिळाला होता थोडा. मग चांगलं ४ खोल्यांचं घर घेतलं होतं त्यांनी.
चाळीतल्या जवळचे संबंध असणाऱ्या शेजाऱ्यांना बोलावलं होतं त्यांनी पुजेला. गेली
होती सायलीची आई. सुरूवातीला नेहमी यायच्या चाळीत भेटायला. मग तिथे बस्तान बसलं, तसं कमी झालं येणं.
आणि आज इतक्या दिवसांनी आल्या होत्या तर आई काही भलतंच सांगत होती.
“आई, काहीही काय...” सायली भांबावली. गिरीश तिच्याबद्दल असा काही विचार करत असेल हे तिला
स्वप्नातही वाटलं नव्हतं. “अगं, गिरीशसाठी स्थळं पाहतायत आता. तर सहज म्हणाल्या, तुला कुणी आवडत असली
तर सांग, बघू आपण. त्याचे बाबा चाळीतल्या एकेक मुलींची नावं आठवत होते. तुझं
नाव पण घेतलं, तर लगेच म्हणाला सायली आवडते मला. तिच्या आई-बाबांना विचारा. त्या
म्हणाल्या, सायलीला पटलं तर प्रश्नच नाही. चौकशी करायची काही चिंताच नाही. समोरच
वाढलीय. दोन दिवसांपूर्वी जन्म वेळ वगैरे विचारली होती त्यांनी फोन करून. मी काही
बोलले नव्हते तुला. म्हटलं हे कुंडलीचं काय ते कळू दे, मग बघू. तर आज त्या
स्वत:च आल्या सांगायला, कुंडली उत्तम जुळते म्हणून. गिरीशचा फोन नंबर देऊन गेल्यात. म्हणाल्या
त्या दोघांना भेटून बोलू-ठरवू दे. आपण तर इतकी वर्षं ओळखतोय एकमेकांना. मुलांनी
निर्णय घेतला तर उडवून देऊ बार. माझी तर चिंताच मिटलीय. एकेक ऐकतो आपण सुनांचे
किस्से .....” आई बोलत होती, पण सायलीचं लक्ष उडलं होतं तिच्या बोलण्यातून. २ दिवसांच्या अंतरात
दोन मागण्या लग्नाच्या. काय आहे हे? आपण काही इतक्या सुंदर, हुशार वगैरे नाही. चार जणी शिकतात,
तशा पदवीधर झालो, एम.बी.ए. केलं, नोकरी करतोय. पगार तसा चांगला आहे, पण कुणाला त्याचं
महत्त्व वाटेल इतका काही अगदी जास्त नाही. आता काय ..... कशी करायची निवड? काय घ्यावा निर्णय? कुणाला विचारू, कुणाशी बोलू.......
पार गोंधळून गेली ती.
सहज एका मैत्रिणीजवळ मोघम म्हणाली, “लग्नासाठी २
प्रपोजल्स आलीत गं एकदम, कन्फ्युज झालेय. कळेना कशी निवड करावी, काय करावं.” मैत्रीण म्हणाली, “त्यात काय, दोघांना भेट. जिधर घंटी बजेगी,
उधर फिक्स करनेका|” घंटी बजी वगैरे तिला जरा फिल्मी वाटलं, पण भेटायला हरकत
नाही एवढं तिच्या लक्षात आलं. मग देसाईकाकांना सांगून तिने शनिवारी नरेनबरोबर भेट
ठरवली आणि त्याच आठवड्यात एक दिवस संध्याकाळी गिरीशलाही भेटली. नरेनला तिने
सांगितलं होतं की जे ठरेल ते मी देसाईकाकांना सांगेन. देसाईकाकांना मात्र तिने
स्पष्ट सांगितलं की मी आणखी एका मुलाला भेटणार आहे, तोपर्यंत माझा निर्णय मी राखून ठेवते आहे.
नरेनसारख्या मुलाला ती लगेच होकार देईल अशा समजुतीत होते ते, त्यांना जरा नवल
वाटलं. पण ते फक्त बरं म्हणाले.
गिरीशला ती नव्याने ओळखत नव्हती, पण ४ वर्षांनी भेटत
होती. चांगलाच फरक पडला होता त्याच्यात. राहणी बदलली होती, त्यामुळे रूबाबदार
दिसत होता. आधी थोडासा अवघडला होता, पण नंतर झाला मोकळा. खूप गप्पा झाल्या, जुन्या आठवणी काढून हसून, चिडवून झालं. नकळत
ती नरेन आणि गिरीशची तुलना करायला लागली. नरेनची भारी कार-गिरीशची बाईक. नरेनने
तिला एकदम पॉश हॉटेलात बोलावलं होतं-गिरीश आणि ती दादर चौपाटीवर भेटले. नरेनच्या
बोलण्यात एकदम कडक मॅनर्स-गिरीशचं बोलणं घरगुती, अघळ-पघळ. शिक्षण, आर्थिक परिस्थिती, घर या बाबीत तर केव्हाही नरेन सरस होता. पण तरी
गिरीशला लगेच नकार द्यावा असं वाटेना तिला.
दोन दिवस सतत हाच विचार करून डोकं सुन्न
झालं तिचं. एका मनाला नरेनच्या वैभवाची भुरळ पडली होती, दुसरं म्हणत होतं पण तो
खरा कसा आहे ते कुठे माहीत आहे तुला. पहिल्या भेटीत काय सगळेच गोड बोलतात. गिरीश
तुझ्या चांगल्याच ओळखीचा आहे. एक दिवस तिने सरळ कागद घेतला आणि दोघांच्या
बऱ्या-वाईट वाटणाऱ्या गोष्टी लिहून काढल्या. नरेनबद्दल फारसं काही माहीत नव्हतंच,
देसाईकाकांनी सांगितलेल्या माहितीत त्याचं आर्जवी, सफाईदार बोलणं, मॅनर्स इतकीच भर
पडली होती. पण गिरीशच्या बऱ्याच गोष्टी आठवत गेल्या. त्यात वाईट नव्हतं काही.
चांगल्या पुष्कळ होत्या, आणि ज्या तिला पटणाऱ्या नव्हत्या, त्या वाईट नव्हत्या.
आपापली मतं म्हणून सोडून देण्यासारख्या होत्या. आता ती अधिक गोंधळली.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये लंच टाईमला
कुठच्याशा नव्या सिनेमाची चर्चा चालू होती. कुणाला नायक, कुणाला नायिका, कुणाला
फाईटस्, कुणाला म्युझिक - आपापली मतं हिरीरीने मांडत वाद रंगला होता. ती फक्त ऐकत
होती, तिने पाहिलाच नव्हता अजून तो सिनेमा. अचानक अकाऊंटंट पटेल म्हणाले, “छोडो यार ये सब, जुना प्रॉडक्ट नये रॅपरमे डाला है| प्रॉडक्ट फ्रेश हो, तो डिस्कस करो कुछ|” मग चर्चा जाहिरातींकडे वळली. सिनेमासहित सगळीकडे
हेच चालतं. नवं काही नसतं, तेच तेच फ्लेवर्स आणि फीचर्स असतात. नावं आणि वेष्टण
वेगळं असतं. लंच टाईमनंतरही ती चर्चा थोडा वेळ रेंगाळत राहिली. हळूहळू सगळे
आपापल्या कामात पुन्हा गुंतले. पण सायलीच्या मनात मात्र जुनं प्रॉडक्ट-नवं रॅपर
हेच घोळत राहिलं. मॅनेजमेंट शिकतांना काहीतरी वाचलेलं आठवत राहिलं. घरी जाताना
मुद्दाम तिने स्लो गाडी घेतली. बसायला नाहीच मिळाली जागा, पण उभं राहायला तरी
निवांत कोपरा मिळाला.
नकळत एक विचार तिच्या मनात शिरला. नरेनचं
एक लग्न आधी झालेलं आहे. म्हणजे वैवाहिक आयुष्याचा अनुभव आहे त्याला. भले त्या
आठवणी आता कडू झाल्या असतील. पण नवरा-बायको या नात्याचा अंदाज आहे त्याला. कसं
वागावं, काय टाळावं हे तो अनुभवाने शिकला आहे. गिऱीश मात्र पूर्ण अननुभवी आहे.
चाळीतला शेजारी राहणारा ओळखीचा मुलगा असला तरी बायकोशी कसं वागावं याचा त्याला
काहीच अनुभव नाही. चुका होण्याची, रुसवे-भांडणं होण्याची शक्यता मोठी आहे. आणि मग
याच दिशेने तिचं मन त्या दोघांची तुलना करत राहिलं. कधी या बाजुने तर कधी त्या
बाजुने झुकत राहिलं. ४-५ दिवस झाले होते गिऱीशला भेटूनही आणि त्याआधीच्या शनिवारी
नरेन. तरी अजून निर्णय होत नव्हता तिचा. आईने दोन वेळा हटकलं होतं. तरी तिला
नरेनबद्दल काही सांगितलंच नव्हतं अजून.
आज पुन्हा जेवताना आईने हटकलं. त्यावर “सांगते ग १-२ दिवसांत. असं प्रेशर नको आणू.” असं म्हणून विषय
टाळला. अंथरुणावर पडल्यानंतर पुन्हा तिच्या मनात नरेन की गिरीश हे द्वंद्व सुरू
झालं. एखाद्या प्रसंगात आपली ‘नवऱ्या’कडून अपेक्षा काय असेल,
मग नरेन काय करेल-म्हणजे त्याचे आडाखे काय असतील आपल्याबद्दल आणि गिरीश कसा जुन्या ओळखीवर
विसंबून नेमका वागेल असा काहीतरी खेळ सुरू झाला तिच्या मनात. अचानक तिच्या मनात एक
वेगळाच विचार चमकला. नरेनचं हे दुसरं लग्न आहे. म्हणजे राग, लोभ, अनुराग, प्रेम, मोह,
शृंगार, रुसवा हे सगळं त्याचं एकदा अनुभवून झालं आहे. सगळ्या भावनांचा पहिला
अपूर्वाईचा बहर त्याच्या आयुष्यात येऊन गेला आहे. तो त्या अनुभवांच्या आधाराने
आपल्याशी वागेल. गिरीशचं तसं नाही. आमचं दोघांचंही अनुभवविश्व सारखंच कोरं आहे.
वैवाहिक आयुष्याचे अनुभवही सारखेच ताजे असतील. शेजारचा मित्र-मैत्रीण ते
नवरा-बायको हा बदल एकदमच होईल आमच्या आयुष्यात आणि ते जास्त रोचक असेल. . . . . .
पण मग नरेन, त्याचं वैभव, मिळणारं आरामशीर, चैनीचं आयुष्य . . . . . . .
ते काय आपल्या नशीबात असेल तर मिळेलच. आपण
इतक्या श्रीमंत राहणीची, चैनीची स्वप्नं कधीच पाहिली नव्हती. आपल्या अपेक्षा आपल्या
मध्यमवर्गीय असण्याला साजेशाच होत्या. ती सगळी स्वप्नं तर पुरी होतीलच, पण संधी
मिळाली तर आम्ही दोघं मिळून आणखीही काही मिळवू शकू आयुष्यात. त्यासाठी हे
गिरीशच्या अनुभव विश्वाचं कोरेपण, नवेपण सोडून नरेनचा ‘दुसरे’पणा का निवडायचा?
लहानपणापासून कपडे, शाळेचा युनिफॉर्म,
पुस्तकं सगळं ताईचंच वापरलं. दिवाळी, वाढदिवस अशा निमित्तानेच नव्या वस्तू, नवे
कपडे मिळायचे. आपल्याला स्वत:ला नोकरी लागल्यावर
मगच स्वस्तातले का होईना, कोरे कपडे वापरले मी. मग आता आयुष्याभरासाठी जोडीदार
निवडायचा, तो असा दुसरेपणाचा का निवडावा? नको ... नकोच.
माझ्याइतकीच
त्यालाही ओढ, उत्सुकता असावी नव्या आयुष्याची. चुकत-चुकतच दुसऱ्याच्या मनात
शिरायचा रस्ता दोघांना एकदमच गवसावा. दुसऱ्या कुणाशीही तुलना नको व्हायला माझी.
तिच्या मनाचा कल हळूहळू गिरीशच्या दिशेने
झुकला आणि डोळा लागता लागता तिचा निर्णय झाला होता. तिने तिची निवड केली होती. आता
उद्या सकाळी आईला ........
पण हा विचार मनात पूर्ण उमटायच्या आधीच
तिच्या डोळ्यांसमोर तिच्या लग्नाची रंगीत स्वप्नं अवतरली होती.
आपला लेख वाचून मला फारच विलक्षण अनुभव आला.
ReplyDelete