जीवनमे एक बार जाना सिंगापोर
#जीवनमें_एक_बार_जाना_सिंगापोर २---
ही माणसं तशी शांतताप्रिय. दहा-साडेदहाच्या सुमारास घरातले दिवे विझतात. भांडणं, मोठ्या आवाजात लावलेलं म्युझिक मी तरी ऐकलं नाही. रस्त्यात एखादा छोटा अपघात झाला, निसटती टक्कर झाली तरी ‘माझीच गाडी सापडली का तुला xxx ?’ असला प्रकार नाही. शांतपणे एकमेकांचे फोन नंबर्स, इतर आवश्यक माहिती घेऊन आपापल्या रस्त्याने निघून जातात. पोलीस येण्याइतकं काही गंभीर असेल तरी 5 मिनिटांत ते येतात, १०-१५ मिनिटांत रस्ता मोकळा करतात. सार्वजनिक जीवनात सामान्य माणसाचा कल शिस्त पाळण्याकडे जास्त दिसतो. रस्ता रिकामा असला तरी हिरवा दिवा लागल्याशिवाय रस्ता ओलांडायचा नाही किंवा गाडी दामटायची नाही हे पाहिलं आणि मुंबई-पुण्यातले उतावीळ ड्रायव्हर्स, सैरावैरा धावत कुठूनही रस्ता ओलांडणारे पादचारी आणि पुण्यातल्या दुचाकीस्वारांच्या आणि रिक्षा चालकांच्या करामती आठवून गहिवरून आलं. क्वचित एखादा दामटायचा गाडी, पण नियम पाळणारे जास्त. काही गाड्यांच्या नंबर पाट्या वेगळ्या रंगाच्या दिसल्या. मुलगा म्हणाला या गाड्यांना फक्त संध्याकाळी ७ नंतर रस्त्यावर यायला परवानगी. रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी फक्त दिवसभर परवानगी. त्याबद्दल त्यांना roadtax मध्ये घसघशीत सूट. पण तिथल्या बस-ट्रेन सेवा अगदी उत्तम आहेत आणि टॅक्सी ड्रायव्हर सहसा नाही म्हणत नाहीत. बस आणि ट्रेनला एकच पास चालतो. स्टेशनमध्ये आणि बसमध्ये शिरतांना आणि बाहेर पडतांना तो पास मशीनवर tap करायचा. तुमच्या प्रवासाचं नेमकं भाडं वसूल होतं. शिल्लक संपत आली की बीप वाजतो मग पास रीचार्ज करून घ्यायचा. रोज सुट्ट्या पैशांसाठी कंडक्टरशी भांडण, रेल्वेच्या पास करता लाईन – काsssही नाही.
सोसायटीमधला सार्वजनिक हॉल भाड्याने मिळतो. तो दहा वाजता रिकामा करायचा हा सोसायटीचा नियम. दहा वाजून पाच मिनिटांनी तो रिकामा व्हायचाच. वॉचमनला ‘पटवून’ बारा वाजेपर्यंत दामटून वापरा हा प्रकार नाही. रस्त्यात दुतर्फा आंब्याची झाडं. त्यावर लगडलेल्या कैऱ्या खाली पडल्या तरी त्यांच्याकडे कुणी पाहत नाही. दगड मारून कैऱ्या पाडण्यातली गंमत तिकडच्या मुलांना कळलेली दिसत नाही. टॅक्सीवाले मात्र गप्पिष्ट असायचे खूपदा. तुम्ही भारतीय आहात, पण हिन्दी किंवा तमिळ बोलत नाही हे कसं? असं एकदा एकाने आम्हाला विचारलं. (सिंगापूरच्या ४ अधिकृत भाषांमध्ये एक तमिळ पण आहे. सिंगापूरची उभारणी करायला गेलेले तमिळ मजूर तिथे स्थायिक झाले आणि अजुनही तिथे तमिळभाषी जनतेचा टक्का बऱ्यापैकी जास्त आहे.) मग आम्ही त्याला सांगितलं की आम्ही बोलतो आहोत ती एका मोठ्या राज्याची official state language आहे आणि आमची मातृभाषा आहे. ‘महाराष्ट्र’ म्हटल्यावर लगेच त्याने ‘शिवाजीराजे, टिळक, गणेशोत्सव’ आपल्याला माहीत आहे असे सांगितले. भारतीय आणि पाकिस्तानी इतके सारखे दिसतात, तर भांडतात का असा प्रश्न आम्हाला एकदा एकाने विचारला. त्यावर आम्ही विषय बदलला. भारतीय इतिहास आणि संस्कृती यांची खूप माहिती आणि उत्सुकता असायची लोकांना.
‘तिकडे कसं सग्गळं छान’ याचा प्रत्यय पहिल्या एक-दोन भेटीत आम्ही घेतला होताच, पण पुढच्या भेटींमध्ये मात्र थोडं धक्कादायक वास्तव दिसलं. बसमधून किंवा रेल्वेमधून विनातिकीट जाणारे प्रवासी मी जवळ-जवळ प्रत्येक भेटीत पाहिले. बरोबरच्या माणसाने पास टॅप केला की त्याला चिकटून आपण चट्कन आत शिरायचं किंवा बाहेर पडायचं. तिकीट तपासनीस कधी आलेला मात्र मी तरी पाहिला नाही. त्यामुळे असे प्रवासी काय कारण सांगतात, त्यांना काय दंड होतो, तिकीट तपासनीस त्यांच्याशी कसे वागतात ते कळले नाही. मॉल्समध्ये छोट्या वस्तू लांबवणार्या चलाख बायका मी पाहिल्या. चायना टाऊनमध्ये पुण्याच्या तुळशीबागेसारखा बाजार आहे. तिथेही की चेन्स, इयर रिंग्ज, हेअर बॅन्ड्स अशा वस्तू उचलल्या गेल्या. आमच्या घरासमोर सोसायटीतल्या मुलांची खेळण्याची जागा होती. मुलांना घेऊन तिथे येणार्या बायका घरी गेल्या की तिथे चॉकलेटचे कागद, छोट्या प्लास्टीक पिशव्या असा कचरा पडलेला दिसायचा. प्रमाण कमी होतं, पण ‘तिथे असं कुणी वागतच नाही’ असं मात्र मला दिसलं नाही.
विजेचं भारनियमन, पाण्याची टंचाई हे शब्दही या लोकांना माहीत नसतील, पण विजेचा आणि पाण्याचा अपव्यय मात्र मी भरपूर पाहिला. आमच्या घरासमोर एका पुलाला सरकता जिना होता. त्यावरून एका दिवसात २४ माणसं गेलेली कधी दिसली नाहीत, पण तो जिना मात्र २४ तास चालू असायचा. अलीकडे ऑटो स्टार्टिंग जिने आहेत, पण अजून सगळीकडे नाहीत अशी माहिती एका चिनी शेजारणीशी बोलतांना कळली. एकदा आम्ही बस स्टॉपवर उभे होतो तेव्हा समोरच्या घरातली बाई पाण्याचा पाईप लावून गाडी धुतांना पाहिली. आम्ही स्टॉपवर यायच्या आधीपासून ती गाडी धुवीत होती आणि १०-१५ मिनीटांनी आम्हाला बस मिळाली तरी तिचं काम चालूच होतं. एक गंमतीशीर विचार आला मनात. आपल्याकडे ‘इंपोर्टेड’ या शब्दाला जे वलय आहे ते तिथे असतं तर ‘आम्ही गाडी धुवायला सुध्दा इंपोर्टेड पाणी वापरतो’ हे वाक्य ती बाई बोलली असती का?
सामाजिक अडचणींचा पाढा वाचणारी आणि सरकार त्यावर काही उपाय करणार आहे की नाही असा खडा सवाल करणारी पत्रं तिथल्या वर्तमानपत्रात रोज ३-४ तरी असायचीच. मोलकरणींचा प्रश्न तिथेही आहेच, पण स्वरूप वेगळं आहे, कारण जीवन, संस्कृति, अपेक्षा वेगळ्या आहेत. भ्रष्टाचार हा सामान्य माणसाला ग्रासून टाकणारा प्रश्न नाही पण तो अजिबात नाहीच असं म्हणण्याचं धाडस स्थानिक माणसं करीत नाहीत. सरकारी कचेऱ्यांत मोठ्या पदावर बहुश: चिनी अधिकारी असायचे. ‘भूमिपुत्रांचे कैवारी’ तिथे आहेत असं मात्र कधी लक्षात आलं नाही. संपूर्ण जीवनाचा विचार केला तर तिथला दर्जा उत्तम आहे हे निश्चित. पण माणसाची लबाड वृत्ती, हावरेपणा जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी त्याची पाठ सोडत नाही. लोकसंख्येच्या आणि सुबत्तेच्या प्रमाणात अशा माणसांचं प्रमाण कमी-अधिक असणारच. माणूस भारतीय आहे की अभारतीय यावर त्याची वृत्ती अवलंबून नसते, हे या निमित्ताने अधोरेखित झालं.
©राधा मराठे
Comments
Post a Comment