शब्द
शाळेत असतांना इंग्रजीच्या बाईंनी एक वाक्य सांगितलं – pen is mightier than sword. लगेच त्याचं मराठीत रुपांतर ‘शब्द हे तलवारीपेक्षा जहाल शस्त्र आहे.’ मग चाळा लागला. कोणता शब्द कशा पध्दतीने उच्चारला तर त्याच्या अर्थाची छटा कशी बदलते. आम्हाला ९वी ते ११वी मराठी शिकवायच्या प्रेमा साखरदांडे. शाळेच्या स्नेहसंमेलनाला नाटक बसवण्यासाठी कधीतरी सुलभा देशपांडे यायच्या. बहिणीला मदत. त्याही हाडाच्या शिक्षिका. एक दिवस त्यांना तालमीचा कंटाळा आला. मग त्यांनी एक खेळ घेतला. एक वाक्य सांगितलं आणि प्रत्येक मुलीला ते वेगवेगळ्या भावनेचा आविष्कार करुन म्हणायला सांगितलं. एक प्रकारे त्यांनी आम्हाला वाचिक अभिनय शिकवला.
तेव्हा एक गोष्ट कळली, नुसता शब्द सामर्थ्यहीन असतो. त्याला पूर्ण वाक्याच्या संदर्भाची, स्वरांच्या हेलकाव्याची आणि अभिनयाची जोड असली तर त्याचं सामर्थ्य खुलून येतं. बोललेला शब्द स्वर, आवाज यांच्या मदतीने नेमकी भावना व्यक्त करतो. अभिनित शब्द अधिक थेटपणे अर्थ प्रगट करतो. पण लिहिलेला शब्द? तो वाचतांना स्वर, अभिनय या कशाचीही जोड नसते. मग त्यातून कसा नेमका अर्थ प्रगट होणार?
यासाठी नेहमी शब्दयोजना अचूक हवी. बोलतांना आपल्या स्वरातून आपल्या मनातली भावनेची बारीक छटा अचूक व्यक्त झाली तर शब्द चुकला तरी आपण तो सावरून घेऊ शकतो. अभिनय करतांना शब्द केवळ माध्यम असतात. पण लेखी शब्द वाचतांना वाचकाच्या मनात कोणताही संभ्रम उभा राहता कामा नये. त्याला विचार करावा लागता कामा नये, अशी शब्दरचना हे लिहिणाऱ्या माणसाचं कौशल्य असतं. सगळ्यांना नाही जमत. ठीक आहे. पण प्रयत्न करीत राहायचं आणि जिथे चुकेल तिथे मोकळेपणी मान्य करायचं की हो बाबा, मला असं असं म्हणायचं होतं, माझा शब्द चुकला. त्यात काही कमीपणा नाही. तांत्रिक, वैज्ञानिक किंवा इतर माहितीपर लेखन करतांना कधीतरी काही दोन अर्थ व्यक्त करणारे शब्द वापरले गेले तरी संदर्भाने त्याचा अर्थ ताडता येतो. पण ललित लेखन करतांना मात्र शब्दाच्या वापराबद्दल अत्यंत जागरुक रहावंच लागतं. नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायला एक क्षणही लागणार नाही. मग होणाऱ्या अनर्थाची जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि परिणामांना तोंडही द्यावं लागेल.
आता इतकं वळण पडलंय हाताला की आज झोपेत कुणी उठवून काही लिहायला सांगितलं तरी नेमका शब्दच वापरला जातो. ललित लेखकांनी फार जपून शब्द वापरले पाहिजेत.
आजच्या तंग आणि तप्त वातावरणात तर शब्द तलवार नाही तर अणुबॉम्बइतके विध्वंसक झाले आहेत. तेव्हा शब्द नेमके वापरा! कधी अर्थाचा अनर्थ होईल आणि अडचणीत येऊ सांगता येत नाही.
Comments
Post a Comment