फुले वेचिता
अप्पांच्या नव्या घराची वास्तूशांत मोठ्या
थाटात पार पडली. २ पिढ्यांचं जुनं घर पाडून तिथेच छान, आधुनिक सुखसोयी केलेलं घर
बांधलं होतं. ते होईपर्यंत कॉलनीतच एका घरात भाड्याने राहत होते. त्यामुळे कामावर
लक्ष ठेवणं सहज शक्य झालं होतं. त्यांच्या मुलाने स्वत: लक्ष घालून घराचं
काम करून घेतलं होतं. बाहेरचा सिमेंटचा चिखल कमी झाल्यावर माळी लावून छान बाग आखली
होती आणि आतली कामं, फर्निचर होऊन राहायला येईपर्यंत मोगरा, जास्वंद, तगर अशा
झाडांना फुलं पण यायला लागली होती. बाकीची झाडंही छान रुजली होती, दिसामाशी वाढत
होती.
कालच्या समारंभानंतर आज घर जरा शांत होतं.
निवांत चालली होती सगळी कामं. अप्पा मात्र रोजच्यासारखे उठून फिरायला जायला तयार
झाले होते. तसंही अलिकडे वयामुळे झोप कमीच झाली होती. चहा घेऊन मुलाने खास आणलेला
ट्रॅक सूट चढवला आणि बूट घालून निघाले.
“थांबा जरा ....” आतून एकदम हाक आली, ते थांबले. काकू तरातरा बाहेर आल्या आणि हात पुढे
करून उभ्या राहिल्या. “काय?” या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “ती खिशातली
प्लॅस्टिक पिशवी द्या इकडे. दारात हवी तेवढी फुलं आहेत आता, काही कुणाच्या
अंगणातली गोळा करायला नकोयत.” अप्पा दचकले. हिला कसं कळलं खिशात गुपचुप प्लॅस्टिक पिशवी घेतलीय ते? न बोलता त्यांनी
पिशवी काढून काकुंच्या हातात ठेवली आणि ते घुश्श्यात बाहेर पडले.
कॉलनीच्या रस्त्यावर फिरताना बाजुच्या
बंगल्यांत फुललेली फुलं त्यांच्याकडे पाहून गोड हसत होती, माना हलवून जणू काही गुड
मॉर्निंग म्हणत होती. इतकी सुंदर, वेगवेगळी, ढीगभर फुलं पाहून अप्पांचे हात
शिवशिवत होते ती गोळा करायला. पण पिशवी काढून घेतली होती काकुंनी, गोळा कशात करणार? चरफडत इकडे तिकडे न
बघता चालायचा प्रयत्न निष्फळ होत होता. कशीबशी अर्ध्या तासाची फेरी पूर्ण करून ते
घरी परतले.
मग हे रोजच व्हायला लागलं. अप्पा
दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ व्हायला लागले. इतक्या वर्षांची सवय जाता येता फुलं बघून
ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन तोडून आणायची. अचानक काकुंनी त्यावर ‘स्टे’ आणला तर कसं निभणार? यावरून काकू खरं तर
नेहमीच चिडायच्या. “लोक हौसेने झाडं लावतात अंगणात, एखादं फूल घ्यावं आपण. इतकी परडीभर
फुलं आणता, त्यांनी काय वाहायचं त्यांच्या देवांना? कोपऱ्यावर आहे
फुलवाला, ५ रुपयांची पुडी ३ दिवस पुरते. दुर्वा. बेल, तुळस सगळं देतो तो. पण
तुम्हाला लोकाच्या दारातून फुलं गोळा करायचाच नाद.” अप्पा मुळ्ळीच लक्ष
देत नसत काकुंच्या या बडबडीकडे. निवांतपणे फुलं तोडायचा उद्योग सुरू ठेवायचे.
म्हणून तर घर बांधतांना मुलाने ही छान बाग करून घेतली होती. पुढच्या सीझनला
प्राजक्त, जुई, झेंडू, शेवंती सगळी फुलं भरभरून आली असती. आत्ताही पुजेपुरती तगर
आणि वासापुरता मोगरा होताच. पण म्हणतात ना, जित्याची खोड ......
एक दिवस अप्पांना अगदी राहवेना. ओंजळभर
फुलं पँटच्या खिशात घालून आणलीच त्यांनी. पण घरात शिरता-शिरता नातू येऊन लटकला
कमरेला आणि त्याच्या घुसळणीत सगळी फुलं चुरगाळली गेली. गुपचूप ती बागेच्या कोपऱ्यात
टाकली त्यांनी. ४ दिवसांनी परत त्यांची सुरसुरी जागी झाली. हाताच्या ओंजळीत मावली
तेवढी प्राजक्ताची फुलं त्यांनी आणलीच. आत येतांना बाहेरच्या ओट्यावरच ठेवून आले.
आणि विसरले नंतर आत आणायला. सकाळची घाई उरकल्यावर काकू जरा टेकायला बाहेर गेल्या
तर तिथे फुलं. चिडल्याच त्या, पण गप्प बसल्या. पूजा करताना काकांच्या लक्षात आलं
आपण फुलं बाहेर विसरलो. चुटपुटला जीव. इतकी कौतुकाने आणली, हिची कटकट नको, नंतर
घरात आणू म्हणून बाहेर ठेवली आणि .... दुसऱ्या दिवशी अप्पा फिरून परत आले तर काकू
ओट्यावर बसलेल्या त्यांना लांबून दिसल्या. अत्यंत जड मनाने हातातली फुलं वाटेत एका
झाडाखाली टाकली त्यांनी. त्यांना रिकाम्या हाताने आलेले पाहून काकू मनाशी हसल्या.
अप्पा जितके नवे मार्ग शोधायचा प्रयत्न
करत होते, काकू त्यांच्या बेतावर पाणी ओतत होत्या. आता अप्पांची चिडचिड मनात
मावेनाशी झाली. बारीक-सारीक कारणांनी ते काकूंवर चिडायला लागले, वसवस करायला
लागले. घरातले नवल करत राहिले. झालं काय अप्पांना? असे चिडचिडे नव्हते
ते कधी. पण काकू शांत होत्या, मनात हसत होत्या. लोकांच्या बागेतली फुलं अशी
त्यांना न सांगता-सवरता आणलेली त्यांना पहिल्यापासूनच आवडत नव्हती. आता तर दारात
फुलं फुलत होती, तर कशाला आणायची हा त्यांचा आक्षेप रास्तच होता. पण अप्पांना
वाटे, ते लोक काही बोलत नाहीत तर हिला का उठाठेव त्यांच्या बागेची आणि फुलांची?
एक दिवस फिरून परत येतांना कोपऱ्यावर
वळले, तर भिंतीवरून बाहेर आलेली तगरीची फांदी वाकवून फुलं काढत होती एक १०-१२
वर्षांची मुलगी. रीतसर स्टूल घेऊन चढली होती. ते तरातरा पुढे आले आणि बखोट धरून
त्या मुलीला उतरवून ओरडले, “कार्टे, पडशील की खाली. आणि इतकी फुलं कशाला आणि कोणाला विचारून
काढलीस?” ती परडी घेऊन पळाली ती अप्पांच्याच घरात शिरली. ते पाठोपाठ शिरले आणि
बघतात तो समोर काकू उभ्या आणि ती मुलगी त्यांच्या मागे लपून अप्पांकडे बघत.
तेवढ्यात सुनीताबाई शिरली आत गेटमधून – “अगं, हिकडे काय करतेस? शाळेला नाही का
जायचं? आणि इतकी फुलं कशाला गं भवाने? चार आण म्हणाली ना
आजी? जा आता घरला. आणि उद्यापासून ४ म्हणजे ४ घ्यायची.
उगा गावलं म्हणून खणू नये असं. जा चल – नसते उद्योग या कार्टीचे.” शेवटचं वाक्य
काकुंना उद्देशून म्हणत ती घरात शिरली. काकुंनी फक्त सहेतुक नजरेने काकांकडे
बघितलं. हजार वाक्यं बोलल्या त्या एका नजरेत. आणि ती अप्पांना बरोब्बर ऐकू आली.
खाली मान घालून घरात शिरले आणि दुसऱ्या
दिवसापासून आपल्याच बागेत फुलं वेचायला लागले. फुलं वेचताना आजपर्यंत गोळा
केलेल्या फुलांच्या आठवणींनी भरून यायचं त्यांना. किती मोठ्या आनंदाला ते मुकले
होते, त्याची कल्पना काकुंना दहा जन्म घेऊनही आली नसती.
राधा मराठे
Comments
Post a Comment