यू टर्न

 

बापूकाका अचानक आलेले पाहून भास्कर चकित झाला. कित्येक वर्षात त्यांची प्रत्यक्ष भेट नव्हती. मधून मधून फोनवर खुशालीचे ४ शब्द बोलणं व्हायचं, तेवढंच. ७-८ वर्षांपूर्वी मनोहरने त्यांच्या मुलाने अमेरिकेचं नागरिकत्व घेतल्याचं कळलं होतं भास्करला. पण काकांशी बोलतांना कधी त्याचा उल्लेख झाला नाही. त्यांनी स्वत:हून काही सांगितलं नाही आणि यानेही आपणहून काही विचारलं नाही. वीस एक वर्षांपूर्वी भास्कर आणि त्याचे आणखी दोन चुलत आणि आत्ते भाऊ यांना बाजारभावाने पैसे देऊन सगळी वडिलार्जित मालमत्ता बापूकाकांनी आपल्या नावे करून घेतली होती, आणि अगदी मनापासून ते ती सांभाळत होते. भास्कर आणि इतरांकडे आंबे, काजू, फणस, आमसूलं आणि इतर वस्तू अगदी नियमाने पोचत्या होत होत्या. एकदाही खंड पडला नव्हता. कधी वेळ आली नाही, पण दोन दिवस हक्काने निवांत राहायला जावं असं बापूकाकांचं घर होतं नक्की.

 

बरोबर आलेल्या तरूण मुलाची त्यांनी ओळख करून दिली. हा आपल्या रामाच्या देवळातल्या कृष्णंभटाचा राघव हो. त्याची बहीण इकडे ह़डपसरला राहते कुठे तरी. तिच्याकडे राहील दोन दिवस. जातांना मला परत घेऊन जाईल. आपल्याला परवा सकाळी लवकर निघायचं हो राघवा. मध्यान्हीला पोचू. फोन करतो उद्या तुला.चहा-पाणी करून राघव गेला. भास्कर काकांशी बोलत बसला आणि नीलिमा स्वयंपाकाला लागली. तुझा मुलगा दिसत नाही रे कुठे?”

बाहेर गेलाय. येईल इतक्यात.

 

थोड्या वेळाने सुमीत आला. जेवणं झाल्यावर भास्कर म्हणाला, काका, सुमीतच्या खोलीत घालतो तुमचं अंथरूण. दमला असाल. झोपा निवांत.

छे रे, दमतोय कशाने. मी का चालवली मोटार? बस इकडे असा. ये गो सूनबाई तू पण. सुमीत, ये इकडे. मला काही गुजगोष्टी करायच्यात तुमच्याशी, म्हणून आलोय मुद्दाम.

सगळ्यांना भोवती बसवून घेऊन काकांनी खाकरून बोलायची तयारी केली. घोटभर पाणी प्याले.

भास्कर, ४ एकराची जमीन होती आपली, सामायिक. तुम्हाला कुणाला काही स्वारस्य नव्हतं, पण मला होतं. मी तुमचे पैसे देऊन तुमच्या वाटणीची मालमत्ता माझ्या नावावर करून घेतली, त्याला झाली आता वीस-बावीस वर्षं. आमचा मनोहर ..... शिकायला गेला, २ वर्षं, ५ वर्षं करत राहिला आणि आता त्याचा पासपोर्ट पण अमेरिकन झाला. त्याच्या मुलाने तिकडचीच कुणी गोरी बायको केलीन् आणि तो तिसऱ्याच शहरात कुठेतरी जाऊन स्थायिक झाला. आता एवढी हौसेने संपत्ती केलेली मी, कोण बघणार तिच्याकडे?

 

 परवा कुणाच्या तरी बोलण्यात आलं, या सुमीतची कंपनी बंद पडलीय आणि दुसरी नोकरी अजून मिळालेली नाही. तेव्हा एक वेडा विचार आला आपला माझ्या डोक्यात. त्याला घेऊन जावं गावाला. तो सांभाळेल सगळं. शिकलेला आहे, सगळी माहिती करून घेणं काही जड जायचं नाही त्याला. त्याच्या नावावर करतो मी सगळं. मी उभा आहे अजून, तोवर चांगला तयार करतो त्याला.

 

घर आहे चांगलं आपलं. त्याला हव्या त्या जास्तीच्या सोयी करून घेऊ. झेडपीच्या हपिसातला नारायण देसाई आहे, त्याने आपल्या परसात ओल्या कचऱ्याचं यंत्र बसवून दिलंय. आपल्या बागेच्या खताचा प्रश्न मिटलाय. कौलावर ती प्यानेल्स लावलीत विजेची. त्यामुळे विजेचा प्रश्न सुटलाय. पावसाळ्यात होतो त्रास. पण आता पाऊसच महामूर आपल्या भागात, त्याला कोण काय करणार!

 

बागेचं उत्पन्न बांधलेलं आहे कारखानदारांबरोबर. रोख पैसे मिळतात. उत्तम वाण आणलेत मी, आणि स्वत: लक्ष देतोय बागेकडे. जुनी माणसं आहेत बांधलेली. निवांत चालू आहे सगळं. पण पुढे हे बघणारं कुणी नाही. विकायला वेळ नाही रे लागणार, मागेन तो दाम हसत देतील माणसं. दृष्ट लागेल अशी उभी केलीय मी वाडी. पण आपलं नाव राहणार नाही, माझा जीव अडकलाय रे तिथे....बोलता बोलता काकांचा आवाज जड झाला. ते थांबले. पाणी प्यायले. एक विचित्र शांतता पसरली. शेवटी भास्करच म्हणाला, काका, पण मनोहर ....

छे, छे, त्याची काळजीच सोड तू. वकिलाकडून नीट सल्ला घेऊन कागद करून घेईन मी. कुणाची शामत नाही सुमीतला तिथून बाहेर काढायची. आणि अरे, आत्ता सांगायचंच नाही कुणाला मी त्याला देणार सगळं म्हणून. आत्ता सांगायचं काहीतरी दुसरं कारण. ते माझ्यावर सोपव तू. एकदा तो सगळं शिकला, तरबेज झाला की मग करू कागद. त्याच्याबद्दल लोकांना खात्री वाटू दे, आपलेपणा वाटू दे. मग नाही काही त्रास व्हायचा हो.

 

पण आजोबा ... आता सुमीतलाही या सगळ्यात रस वाटायला लागला. समजा, मला नाही जमलं हे सगळं सांभाळायला, तर पुन्हा इथे परत येऊन काही कामधंदा पण मिळणार नाही मला. वय वाढेल माझं. मग...?”

 

अरे, मुदलात असं होणारच नाही. आणि झालं समजा तर इथे काही स्वत:चं काम सुरू कर, मी देईन भांडवल. तुझं काम सुरू करून ते मार्गी लागण्यासाठी लागेल तितका पैसा पुरवण्याची जबाबदारी माझी.

 

मग बराच वेळ चर्चा झाली. भास्कर आणि सुमीत सुचलेल्या सगळ्या शंका विचारत होते, बापूकाका कधी नेमकी उत्तरं देत होते, कधी विचारू वकिलाला-शेतकी कालेजात-नारायण देसायाला... असं सांगत होते.

 

मध्येच नीलिमा म्हणाली, काका, एक विचारते. नाही म्हणजे .... अलिकडे कोकणात मुलांची लग्नं वेळेवर होत नाहीत असं आलं कानावर. तिथल्या मुलींना पण मुंबई-पुण्याकडचे, शहरातले नवरे हवे असतात. हा इथून उठून तिथे जायचा, वर्षा-दोन वर्षात लग्नाचं वय होईल..... मला आपली शंका आली म्हणून मी....

अगो, बरोबर आहे तुझं. आईला यायच्याच अशा शंका. पण असं बघ, आपलं जिल्ह्याचं गाव. सगळ्या सोयी आहेत. अगदी या मुलांचं काय ते इंटरनेट-ते पण आहे हो. गेल्या वर्षी ५-६ कोल्हापूर मुंबईच्या मुली लग्न करून आल्यात गावात. अगो, इथे नोकरी पडते गळ्यात. तिथे तो काच नाही. घर सधन असलं तर नोकरी नाही करावी लागत. २-४ महिन्यांनी यायचं पुण्या-मुंबईला. सगळ्यांनी घरं घेतलीयेत हो इकडे. गुंतवणूक होत्ये आणि हक्काचं घर मिळतं डोकं टेकायला. याला तर काय आहेच त्याचं घर इथे.

 

चला झोपू या आता. उद्याचा दिवस आहे हातात उरलेलं बोलायला, असं म्हणून भास्कर उठला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा जाता-येता तीच चर्चा होत राहिली. शंका-उत्तरं संपतच नव्हती. संध्याकाळी मात्र बापूकाका आपणहून म्हणाले, अरे भास्करा, जरा पाय मोकळे करून येतो. कालपासून अगदी बसून राहिलोय, सवय नाही इतकं एका जागी चिकटून राहायची. त्यांना आपसात काही बोलायचे असेल आणि ते आपल्यासमोर बोलता येणार नाही हे त्यांनी ओळखलं, आणि निमित्त काढून बाहेर पडले. ते बाहेर गेल्यावर आपोआपच भास्कर, नीलिमा आणि सुमीत यांची मिटींग भरली.

सुमीत, मला वाटतं तू ही संधी घ्यावीस ...सुमीत काही बोलणार तो त्याने त्याला थांबवला आणि म्हणाला, पुरतं ऐक आणि मग ठरव. आत्ता तू फक्त २६ वर्षांचा आहेस. २ वर्ष तू प्रयत्न करू शकतोस. जमलं, तुला आवडलं तर प्रश्नच नाही. पण कोणत्याही कारणाने तुला परत यावंसं वाटलं तर केव्हाही येऊ शकतोस. तोपर्यंत काही सगळ्या नोकऱ्या किंवा कामाच्या संधी संपून जाणार नाहीत नक्की. एक संधी दे स्वत:ला वेगळं काहीतरी करायची.

पण बाबा .... मी ऐकलंय की कोकणी माणसं जरा .... म्हणजे मला वापरून घेऊन नंतर ...

सुमीत, अशी लबाड माणसं शहरात नसतात असं म्हणायचंय का तुला? कुठेही भेटतात अशी माणसं. पण बापूकाका तसे नाहीत. ते असं कधीच वागणार नाहीत. माझी खात्री आहे. तू जाऊ नको पटत नसलं तर, पण असा संशय नको घेऊ. पैसे करून मुलाच्या नावे ठेवले असते तर आपल्याला कळलंही नसतं आणि ते चूकही नसतं ठरलं. पण मायेने जोपासलेली वाडी आपल्याच पुढच्या पिढीने उपभोगावी हा हेतू त्यांचा....

नाही बाबा, तसं नाही. मला आपलं ऐकलेले किस्से आठवले. . . . . . जाईन मी बाबा. तुम्ही म्हणता तसं दोन वर्षं एक वेगळा अनुभव घेऊन बघतो. दोन वर्षं हा काही फार मोठा काळ नाही. अशी जातील. नाही जमलं तर केव्हाही परत येता येईल. सांगा तुम्ही आजोबांना तसं.

 

रात्री जेवणं झाल्यावर भास्कर बापूकाकांना म्हणाला, काका, येईल सुमीत तुमच्याबरोबर. त्याला जरा नवं काहीतरी करून बघता येईल. वेगळा अनुभव मिळेल. आवडलं त्याला तर तुमची इच्छा पूर्ण होईल, नाहीतर आहेच शहर आणि तिथली नोकरी.

 

काका समाधानाने हसले. ६० वर्षांपूर्वी भास्करचे वडील आधुनिक विद्येच्या ध्यासाने गाव सोडून शहरात आले होते, भास्करही तिथेच रमला. पण त्याचा मुलगा मात्र आता यू टर्न घेऊन पुन्हा मूळ ठिकाणी निघाला होता, एका नव्या अनुभवाला, वेगळ्या आयुष्याला सामोरा जात होता.

 

राधा मराठे

Comments

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न