बोच
ती गेली त्याला पंधरा दिवस होऊन
गेले होते. सगळे सोपस्कार होऊन घरातली माणसं आपापल्या उद्योगाला लागली. आता त्याला
तिचं नसणं अंगावर यायला लागलं. विरहाने व्याकुळ वगैरे कदाचित नसेल झाला, पण इतक्या वर्षांचा सहवास असा अचानक संपणं – माणसाला
वेळ लागतो वास्तव स्वीकारायला.
एक दिवस मित्राशी बोलताना
अपरिहार्यपणे तिची आठवण निघाली. “गेली दोन वर्षं फार चिडचिडी झाली होती. काहीच
मनास येत नव्हतं. सारखी काहीतरी फुसकं कारण काढून चिडायची नाहीतर रडायची. तेच
डोक्यात चढलं बहुतेक आणि अचानक अशी ब्रेन हेमरेज होऊन ....” बोलता बोलता तो
थांबला. घशात अडकलेला आवंढा गिळून शांत बसून राहिला. जरा वेळाने मित्र म्हणाला, “कशाने चिडचिड होत होती इतकी, तू विचारलं नाहीस का? म्हणजे अगदी हेमरेज होईपर्यंत – इतका कसला ताण......?” तो चमकला. खरंच, कशाने होत होती इतकी
चिडचिड? आठवायचा खूप प्रयत्न केला
त्याने, पण काहीच हाती लागेना.
त्याची अस्वस्थता बघून मित्राने निरोप घेतला आणि हा तिथेच बसून राहिला. गेली
दोन-अडीच वर्षं त्याला आठवत राहिली.
तिची सततची चिडचिड, त्याला फटकारून, तोडून बोलणं, कशातही रस न घेणं, सगळ्यांशी संबंध कमी करून
जवळ जवळ एकटी राहणं... तो वैतागायचा तिच्यावर. दोघांच्यात कुणी एक अति सज्जन किंवा
अगदी नतद्रष्ट नव्हतं. तशी ती संतापी होती; पण अलिकडे ती जास्तच चिडचिड करायला, क्षुल्लक करणाने संतापायला लागली होती. एकेकदा तासन् तास रडायची. कशाने? कसलं दु:ख होतं तिला एवढं की डोळ्याचं पाणी खळत
नव्हतं तासन् तास? खूप ताण देऊनही त्याला
आठवेना आणि जसजसं आपल्याला आठवत नाही हे लक्षात यायला लागलं, तसतसा तो अधिकाधिक अस्वस्थ झाला. म्हणजे आपण तिला
विचारलंच नाही 'काय झालंय’ असं?
असं वागलो आपण? ती चिडचिड करते म्हणून आपण करवादत राहिलो, ओरडत-भांडत
राहिलो पण एका शब्दाने विचारलंच नाही तिला की बाई काय झालंय, का अशी चिडचिड करते
आहेस सारखी? आपल्या मनाने गृहित धरत
राहिलो – हे झालं म्हणून, ते नाही झालं म्हणून. पण तिलाच विचारावं हे कसं सुचलं
नाही आपल्याला? याच्यावरून तर कित्येकदा
भांडण झालं होतं. ती म्हणायची, “अशा गृहित कशा धरता गोष्टी आपल्या मनाने? तुम्हाला जे वाटतं ते तसंच असतं असा निष्कर्ष कशावरून काढता? इतरांना काही वेगळं वाटू शकतं, त्यांचं वेगळं म्हणणं
असू शकतं असं कधीच वाटत नाही तुम्हाला.”
तिलाही आपण फार गृहित धरलं का? तिच्या क्षमता आपल्याला
महत्त्वाच्या वाटल्याच नाहीत. जे नाही त्यावर सतत बोट ठेवत राहिलो, जे आहे त्याची कदर करायला विसरलो. मी
असा, मी तसा, माझा संघर्ष, माझं यश हेच आणि एवढंच. आपल्या संघर्षात तिचा काहीच –
अगदी कणभरही वाटा नव्हता?
एकेक प्रसंग आठवत राहिला. अमुक
वेळी ती असं वागली, तसं बोलली, हे केलं, ते टाळलं ....... पण तरीही पुन्हा पुन्हा
तो एकाच ठिकाणी ठेच खात राहिला, तिची चिडचिड कशाने होत होती, इतकी का आणि कुणावर
संतापत होती ते आपण तिला विचारलंच नाही. कदाचित त्या निमित्ताने ती भडाभडा मोकळं
बोलली असती, हलकं झालं असतं जे दु:ख होतं ते. आपण तिची दखल घेत नाही या ताणाची भरच पडली तिच्या
संतापात..... इतकी की तो ताण झेपला नाही
तिच्या मेंदूला आणि त्याने शरणागती पत्करली. आपल्याला किती वेळा विचारलं असेल तिने
–
“चेहरा का उतरलाय, काही होतंय का.” आपल्याला तेही आवडायचं नाही. आपण खेकसायचो. ती म्हणायची तसं गृहित धरलं तिला.
आपल्याला आवडत नाही कुणी काही विचारलेलं, म्हणून आपणही नाही कधी कुणाला विचारलं
काही. आपला आपणच निष्कर्ष काढला. आपण तिची पुरेशी दखल घेत नाही हेच दु:ख असेल कदाचित तिला, याचाच ताण असह्य झाला असेल....
वेळ कुणाला चुकत नाही, पण निदान
आपण दखल घेतली, विचारपूस केली, मन मोकळं करता आलं - इतका तरी थंडावा मिळाला असता
तिच्या जीवाला जाताना. थकल्या पावलांनी घराकडे जाताना तो हाच विचार करत राहिला. तिची
तळमळ जाणून घ्यायला आपण कमी पडलो ही बोच घेऊनच आता त्याला उरलेलं आयुष्य जगायचं
होतं. पावलांबरोबर आयुष्यही ओढावं लागणार होतं आता.
Comments
Post a Comment