यू टर्न
मिहीर गेले आठ-दहा दिवस अस्वस्थ होता.
श्रद्धाच्याच नाही, तिच्या सासूबाईंच्याही लक्षात आलं होतं. त्या म्हणाल्याही, “काय बिनसलंय गं याचं?” काहीतरी उत्तर दिलं
खरं तिने, पण सध्या त्याच्या कंपनीत appraisal सुरू आहे हे तिला माहीत होतं, त्यामुळे
तिने त्याला जास्त हटकलं नाही.
शनिवारी सकाळी तिचा भाऊ येऊन काहीतरी कारण
सांगून मुलांना घेऊन गेला, तेव्हा तर तिला फार नवल वाटलं. सुटीच्या दिवशी मुलांना
कुठे पाठवायला नाखूष असायचा तो. एक तर आठवडाभर मुलं फारशी भेटायचीच नाहीत आणि
शनि-रवि लोकांचे काही ना काही कार्यक्रम असतात, घरात निवांतपणा हवा असतो. अशा वेळी
त्यांच्या खासगी वेळावर अतिक्रमण होईल असं काही करू नये असं म्हणायचा तो. पण आज
काही बोलला नाही.
स्वयंपाकाच्या तयारीला लागली ती. तिघंच
आहोत, काय करावं या विचारात असताना त्याने हाक मारली. “श्रद्धा, जेवायला
मागवू बाहेरून. बाहेर ये जरा. मला बोलायचंय महत्त्वाचं. आई, तू पण ये बाहेर.” त्याचा स्वर गंभीर
होता. तिला जरा काळजी वाटली. ती आणि सासूबाई बाहेर येऊन बसल्यावर २-३ मिनिटं तो
स्वस्थ बसला. मग किंचित खाकरून बोलायला लागला.
“गेले आठ दिवस विचार करून मी एक मोठा निर्णय घेतलाय. नेहमीप्रमाणे
तुमच्याशी चर्चा नाही केली, कारण या वेळी मला माझ्या मनाप्रमाणेच व्हायला हवंय. तुम्ही
दोघी माझं ऐकाल, समजून घ्याल अशी खात्री आहे म्हणून हा निर्णय घेतलाय मी.
मुलांच्या शाळा सुरू व्हायच्या आधी आपण
जुन्या घरी राहायला जातोय. हे घर विकून बँकेचं कर्ज फेडून उरलेल्या पैशात नवं कर्ज
घेऊन मोक्याच्या जागी एक जागा घेऊन ठेवू. कमर्शियल. सध्या ती बंद ठेवू. बघू पुढे
काय करायचं तिचं ते.”
श्रद्धा काही बोलणार तेवढयात त्याने तिला
थांबवलं. “मध्ये काही बोलू-विचारू नको प्लीज. माझं बोलणं पूर्ण होऊ दे आधी.
मला नोकरी सोडावी लागेल कदाचित.......
..........
..........
दहा दिवसांपूर्वी देसाईंनी मला बोलावून
सांगितलं की वर्ष अखेर आणि appraisalच्या कामाने तो अगदी थकून गेलाय. थोडं रीलॅक्स होण्यासाठी लोणावळ्याला
जाऊ, तो आणि आपण दोघं.”
श्रद्धा आणि मिहीरच्या आईचे डोळे मोठे झाले.
तोंड उघडं पडलं. तिघांनीच जायचं याचा अर्थ तर उघड होता.
“मी काही उत्तर दिलं नाही. माझी जीभ टाळ्याला चिकटली होती. काही
सुचेनाच. सिनेमात बघितलेले हे असले प्रसंग वास्तवात घडत असतील अशी मला खरंच कल्पना
नव्हती. जे घडतं तेच दाखवतात की जे दाखवतात ते बघून यांना असलं काही सुचतं – नाही
माहीत. पण मी गप्प बसलेला पाहून देसाई जोरात हसला. “मेरे साथ छुट्टी नही
एन्ज़ॉय करनी है, लगता है| कोई बात नही| मै कोई और साथी ढूँढ लूँगा|”
पण आता मला तयारीत राहावं लागेल. डिमोशन
किंवा नोकरी सोडणं – काहीही होऊ शकतं. आपली लाईफ स्टाईल आपल्याला पुन्हा
जुन्यासारखीच करावी लागेल. नोकरी गेली तर या घराचे हप्ते, मुलांच्या शाळा, घर हे
खर्च एकट्या श्रद्धाच्या पगारात नाही होणार. हे घर नाही परवडणार. हप्ते नाही भरू
शकलो तर बँक जप्ती आणेल. त्यापेक्षा आपणच वेळेवर निर्णय घेऊन आवश्यक ते बदल करावे
असं मी ठरवलं. सगळी चौकशी केलीय. मुलांच्या जुन्या शाळेत प्रवेश मिळेल म्हणाल्यात
प्रिन्सिपॉल मॅडम. भाडेकरूला लेखी नोटीस दिलीय मी. सुदैवाने समोरच्याच सोसायटीत
जागा मिळतेय त्याला, लगेच १५ दिवसांत जातोय तो. काहीच गैरसोय होणार नाही त्याची. हे
सगळं नीट ठरवायला वेळ हवा होता, म्हणून मी आधी काही बोललो नाही तुमच्याजवळ.”
.....
“खरं म्हणजे ..... डिमोशन घेऊन तिथेच नाही नोकरी करू शकणार मी. म्हणजे
नोकरी सोडावी लागेल हे नक्की. दुसरी कधी मिळेल, कशी मिळेल, कुठे मिळेल सगळंच
अंधारात. हातात काही पर्याय असावा, म्हणून जागा घेऊन ठेवायची. हे घर विकून आलेले
पैसे आणि श्रद्धाचा पगार यात काही दिवस निभेल. तोपर्यंत मी नव्या जागेत चक्क
कोचिंग क्लासेस सुरू करेन. ज्युनियर स्टाफला ट्रेनिंग द्यायचा सराव आहे मला.
तेव्हा काढलेल्या नोटस् आहेत माझ्याजवळ. थोडा अभ्यास पुन्हा करावा लागेल, पण तो
करेन मी.”
“मिहीर, इतका निगेटीव्ह विचार का करतोस? कदाचित आहेस तिथेच,
तसाच राहशील…..”
“नाही. तरीही असा विचार करणाऱ्या माणसाबरोबर मी नाही काम करू शकणार.
शिवाय ज्याला प्रमोशन मिळेल त्याने ते कसं मिळवलं या विचाराने मी त्याच्याशीही
नाही पूर्वीसारखा वागू शकणार. नकोच ते. वेळीच बाहेर पडावं, मागे फिरावं हे बरं. सुदैवाने
मला हे शक्य तरी आहे. मी पुन्हा उभा राहू शकेन. पण गेल्या काही वर्षात नोकरी सोडून
गेलेले, किंवा इथेच डिमोशनवर काम करणारे माझे काही सहकारी आठवून मला कसंतरीच
होतंय. बाहेर पडलेले काही सगळेच खूष नाहीत. काही ना काही तोटा सोसावाच लागलाय. इथे
जे खालच्या पोस्टवर ढकलले गेलेत, त्यांचे चेहरे तर बघवत नाहीयेत मला गेले आठ दिवस.”
सुरूवातीला ‘कदाचित’ म्हणणारा मिहीर बोलणं संपता
संपता नोकरी सोडण्याच्या निर्णयावर ठाम झाला. गेली काही वर्षं मिळालेल्या प्रमोशन,
पगारवाढ यांमुळे शक्य झालेला हा उच्चभ्रू वस्तीतला फ्लॅट, अलिशान गाडी, उंची
फर्निचर, श्रीमंती राहणी याची किंमत चुकवण्यासाठी तो जीव तोडून मेहनत करत होता.
कंपनीशिवाय जग उरलं नव्हतं त्याला. पण ते ऐश्वर्य टिकवण्यासाठी भलती-सलती किंमत
द्यावी इतकं ते अपरिहार्यही वाटत नव्हतं त्याला. जिथून आला तिथे परत जाण्याने वैभव
कमी होईल, पण सुख, शांती टिकेल याची त्याला खात्री होती आणि त्यासाठी मागे
फिरायची, मूळ ठिकाणी परत जायची त्याची तयारी होती.
श्रद्धाने उठून सरबत करून आणलं. ते
घोट-घोट पीत राहिला. सरबत संपल्यावर ग्लास उचलता-उचलता ती सासूबाईंना म्हणाली, “स्वयंपाकघर आवरायला
घेऊ या. केव्हाही येतील मूव्हर्स-पॅकर्स. आपण तयारीत राहिलेलं बरं.”
“खरंच गं बाई, कामाला लागू या आता. तू नीट प्लॅन कर, मग ठरवू कधी-कसं
ते .......”
सासू-सुना बोलत-बोलता आत गेल्या. त्याने
फोनवरून जेवण मागवलं आणि तिथेच सोफ्यावर आडवा झाला. मुलांना कसं समजवायचं,
मित्रमंडळ-नातेवाईक यांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची याचा विचार करता करता
क्षणात झोप लागली त्याला. अशी झोप खूप दिवसांत-वर्षांत लागली नव्हती.
Comments
Post a Comment