तिची वाट
आभाराचं छोटंसं भाषण संपवून नेहा थांबली.
स्टाफने टाळ्या वाजवल्या. सगळ्यांशी एखाद-दुसरा शब्द बोलून ती निघाली. दामोदर
शिपायाने फुलांचे गुच्छ गाडीत ठेवले. आपली छोटीशी गाडी घेऊन ती कॉलेजच्या गेटमधून
बाहेर पडली. उद्या तिच्या प्राचार्यपदाचा पहिला दिवस. प्राचार्य डॉ. नेहा सबनीस, ..... घरी येतांना
वाटेत फुलचंद हलवायाकडून मिठाई घेतली, नमकीन घेतलं आणि घराकडे वळली. घरी अवनी आणि तिचे आजी-आजोबा वाट बघत
होते. आज तिच्या प्रमोशनची बातमी येणार हे त्यांना माहित होतं, ती प्राचार्य होणार
याची खात्री होती, पण तिच्या तोंडून प्रत्यक्ष बातमी ऐकण्याची उत्सुकता होती. तिच्या
हातातले गुच्छ, मिठाईचे खोके बघून अवनी धावत बाहेर आली. आणि नेहाच्या गळ्याला तिने
मिठी मारली. “अगं, घरात तर चल आधी,” गळ्याची मिठी सोडवून तिला नेहाने जवळ घेतली. आई-अप्पा खुश होते.
रात्री गोडाचं जेवण झालं, पाठोपाठ आईस्क्रीम झालं. रात्री अंथरुणाला पाठ टेकल्यावर केव्हा
झोपेने घेरलं, कळलंच नाही तिला.
पहाटे कसल्या तरी आवाजाने जाग आली.
घड्याळात बघितलं पावणेचार वाजले होते. खिडकीतून बाहेर डोकवून कसला आवाज त्याचा
अंदाज घेत राहिली, पण सगळीकडे सामसूम होती. ‘असेल काहीतरी....’ असं म्हणून ती परत आडवी झाली. पण झोप एकदा उडली ती उडलीच. मग आजपासून
असलेल्या नव्या जबाबदारीच्या विचाराने तिला जरा उत्साह वाटला. प्राधान्याने
काय-काय करायचं ते तिच्या मनात उमटायला लागलं. उठून तिने दिवा लावला आणि डायरी
उघडली. एकामागून एक नोंदी करायला सुरुवात केली. मग त्याच्यावर प्राधान्यक्रमाचे
स्टार्स... थबकली. ही सवय सुभाषची. महत्त्वाच्या कामांच्या नोंदी करायच्या आणि
त्यावर असे स्टार्स. मग त्या क्रमाने कामं झपाझप उरकायची. ती हसायची. “घरातल्या
कामात पण तुझं प्रोसिजर...”
“काम हे काम असतं, नेहा. घरचं की
दारचं याला महत्त्व नाही.”
लग्न झाल्यावर शहरात संसार थाटत असतांना
तिने त्याला विचारलं, “आई-अप्पा गावालाच राहणार का?”
“त्यांचा संसार तिथे आहे. ते तिथेच
राहतील. इथे आपला संसार आहे. एकमेकांच्या संसारात डोकवायला जायची काही गरज नाही.”
तिला नवल वाटलं. असा कसा हा कोरडा? लग्नाची मागणी घातली तेव्हाही “मला उगाच घोळ घातलेले आवडत नाहीत, लग्न कोर्टात
करायचं आणि संध्याकाळी घरी जायचं” असंच सांगितलं होतं. ती थोडी खट्टू झाली, पण त्याचा रुबाब
आणि एकंदर व्यक्तिमत्वाची अशी मोहिनी पडली होती तिच्यावर, की मुकाट मान
डोलावली तिने. आई-बाबांनी थोडं बोलायचा प्रयत्न केला, पण त्याने तटकन
तोडलंच त्यांचं बोलणं.
हळूहळू तिला सवय झाली त्याच्या या
वागण्याची. सगळं काही रोखठोक. Romantic वगैरे कधी तो वागलाच नाही. फक्त गरज. तिला असह्य होण्याइतका अतिरेक
नाही केला, त्याच्या कोरडेपणात इतकीच हिरवळ. अवनीचा जन्म झाल्यावर ती तिच्यात
गुंतली. त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. पण तिला वाटलं, सगळ्यांचंच असं होत
असेल, मूल झालं की नवरा-बायकोचं नातं बदलतंच. ते फक्त नवरा-बायको नाही
राहत. बाळाचे आई-बाबा होतात. अवनीच्या वेळी सुध्दा तो एकटा जाऊन आई-अप्पांना भेटून
आला. बारशाला ते आलेच नाहीत. तिच्या आईनेच केलं सगळं. अवनी दोन वर्षांची झाली तो
तिचे आई-वडील पाठोपाठ वर्षभरात गेले. ती अगदी एकटी पडल्यासारखी झाली. रडायला
त्याने खांदा सुध्दा पुढे केला नाही, ना तिच्या पाठीवरून हात फिरवला. आपले कढ आपण आवरून ती अवनीमध्ये
विश्व बघायला लागली. एक दिवस तिच्या लक्षात आलं की त्याची ‘गरज’ अचानक मिटली होती.
हे कसं? का? हळूहळू बाहेरून काही गोष्टी कानावर आल्याच. बरोबर काम करणाऱ्या कुणा
स्त्रीशी त्याची खास मैत्री वगैरे. तिने
एक दिवस भीत भीत त्याला विचारलं. हातातले कागद तसेच धरुन त्याने चष्म्याच्या वरुन
तिच्याकडे पाहिलं. “हो. तू आता फक्त अवनीची आई झाली आहेस. माझी बायको उरलेली
नाहीस. मला नाही आवडत असलं काही. माझ्या आयुष्यात मला कोणते अडथळे नको असतात.
सुरळीत सुरु राहायला हवं असतं.” इतकं बोलून तो पुन्हा त्या कागदांत गढून गेला. जणू
ते कागद आणि ती यांच्यात काही फरकच नव्हताच. गरज असेपर्यंत फाईलमध्ये सांभाळून
ठेवले, नंतर फाडून टाकले. ती भांबावली, कितीतरी दिवस एकटी रडली. कुणाला सांगणार?
आणि ज्याची भीती होती ते एक दिवस झालंच.
तो तिला सोडून निघून गेला. शांतपणे आपलं सामान आवरलं. “मी जातोय.
घटस्फोटाचे कागद सही करून ठेवलेत. कधीही जमा कर. मी येऊन तुला मोकळी
करेन. घर तुझ्या नावाने केलंय. मुलगी आहे माझी. तिच्या डोक्यावर छप्पर देतोय.
यापेक्षा जास्त अपेक्षा करू नको.” दोन दिवस ती भिरभिरल्यासारखी वावरत होती. अखेर मनाचा हिय्या करून
गावाला गेली. सासु-सासऱ्यांना सगळं सांगितलं. तेही हतबुद्ध झाले. अवनीचं शाळेत जायचं वय
झालं तसं सासऱ्यांनी गावचा पसारा आवरला आणि शहरात आले. वर्षभर बंद असलेलं घर
उघडलं. नव्याने सगळं मांडलं. अवनीची शाळा आणि तिचं पुढचं शिक्षण एकदम सुरू झालं.
सासऱ्यांनी जबरदस्तीच केली. “मी काही तुला जन्माला पुरलो नाही. तुला आपल्या पायावर उभं राहावंच
लागेल एक दिवस.” सुरूवातीला जड गेलं. घर आणि अभ्यास ताळमेळ जमवतांना तारांबळ उडाली. पण
सासुबाईंच्या मदतीने तिने ते जमवलं.
घटस्फोटाचे कागद पडून राहिले तसेच. तिने
सही केली नाही, तोही विचारायला आला नाही. त्याचा ठावठिकाणाही तिला कळत नव्हता.
तिने फार प्रयत्नही नाही केला शोधण्याचा. उपयोग नाही हे तिला माहित होतं. ती
निश्चयाने आपली वाट चालत राहिली.
पदव्युत्तर पदवी झाली. आणि एका नवीन सुरू
झालेल्या कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळाली. तिथे जरा रुळल्यावर तिच्या मनात
डॉक्टरेट करण्याचा विचार आला. सासूबाई थकल्या होत्या. घरात मदतीला दिवसभराची बाई
ठेवली आणि पुन्हा एकदा तिचा अभ्यास सुरू झाला. हाती घेतलं ते जिद्दीने पूर्ण
करायचं हा आता तिचा स्वभावच झाला होता. ३-४ वर्ष अथक मेहनत करून तिने तिच्या
विषयाची डॉक्टरेट मिळवलीच.
आणि आज त्याचं फळ तिला मिळालं होतं. पहिले
प्राचार्य निवृत्त झाल्यानंतर सर्वात जास्त क्वालिफाईड या निकषावर प्राचार्यपदाची
माळ तिच्या गळ्यात पडली होती. अवनीची पदवी आणि तिची बढती असा दुहेरी आनंद घरात
भरून राहिला होता. उजाडत आलं होतं. तोंडावर पाणी मारून ती घरात आली. चहाचं आधण
ठेवलं. देवासमोर उभी राहिली.
“तो सोडून गेला तेव्हा वाटलं होतं, संपलं सगळं. त्याच्या कोरड्या
वागण्याने आधीच जीव घाबरत होता. त्यात अचानक आलेलं हे एकटेपण. पण तुला माझी काळजी.
गुणी लेक आणि डोंगरासारखे भक्कम सासू-सासरे दिलेस मला. कठीण होता प्रवास, वाटेत
काटे-गोटे होते. पण सावरणारी, फुंकर घालणारी मायेची माणसंही होतीच सोबत.
त्यांच्याशिवाय नसते पोचले इथवर. त्यांना दु:ख होईल असं काही कधी नको घडू देऊ माझ्या हातून. माझ्या अवनीचं आयुष्य
कोणत्याही काट्यांवाचून सुरळीत जाऊ दे.”
निश्चिंत, शांत मनाने तिने आपलं आवरायला
घेतलं. पुढची वाट स्पष्ट दिसत होती आणि त्या वाटेवर काटे, दग़ड-गोटे नव्हते.
यशाची, आशेची मऊ हिरवळ दिसत होती तिला.
Comments
Post a Comment