विश्वास
विश्वास
रात्रीची जेवणं
झाली. मागची झाकपाक करून सुचेता खोलीत आली. अरविंद आणि सायली बाहेरच होते tv बघत. जरा वेळाने ती
दोघंही आत आली. आल्या आल्या ५ मिनिटात सायली गाढ झोपली. सुचेताने अरविंदला खूण
केली आणि ती बाहेर येऊन गच्चीत बसली. तिच्यापाठोपाठ तो येऊन तिच्या बाजुला बसला.
काही विशेष बोलायचं असेल तर त्याला असं गच्चीत बोलवायचं ही तिची सवय. त्यामुळे ती
काही बोलेल म्हणून तो अपेक्षेने तिच्याकडे बघत होता. पण ती घुटमळत होती.
"अगं,
बोल ना. काही बोलायचंय ना तुला".
तरीही ती गप्प. जे
बोलायचंय ते काहीतरी गंभीर असेल म्हणूनच ती अशी घुटमळते आहे, हे त्याच्या लक्षात
आलं. तिच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, "काय गं, घुटमळते आहेस, काही 'गडबड' नाही ना झालेली?"
"छे छे! काहीतरीच काय..." तिने झटकून टाकलं.
"मग इतकं का अवघड जातंय बोलायला? बोल ना पट्कन."
अखेर मनाचा हिय्या
केल्यासारखं ती सावकाश बोलली.
"आपण वेगळं राहू या."
त्याला क्षणभर काही
कळलंच नाही ती काय बोलतेय ते. कारण लग्न झाल्यानंतर गेल्या ७ वर्षात आई किंवा
बायको यांच्यापैकी कुणीच त्याच्याजवळ कुरकुर केली नव्हती दुसरीबद्दल. मधून मधून
जाणवायचं आज वातावरण तापलंय असं, पण त्यांचं त्या आपसात मिटवायच्या.
त्याच्यापर्यंत नाही आणलं कधी कुणीच. आणि आज किरकोळ तक्रार वगैरे नाही तर थेट
वेगळं घर करण्याचा प्रस्ताव? म्हणजे काहीतरी गंभीर घडलंय नक्की.
"तू आता मला लेक्चर देऊ नको आपण सगळ्यांनी एका
घरात राहण्यात कसे आणि कोणते कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक फायदे आहेत त्याचं.
मला ते सगळं माहीत आहे, पाठ आहे. म्हणूनच गेली ७ वर्षं आपण चौघं एकत्र
राहतोय. मी कधी तुझ्यापर्यंत तक्रार आणली नाहीये कसली. पण आता ....."
बोलता बोलता तिचा
गळा दाटून आला आणि ती उठून निघून गेली. अरविंद तसाच बसून राहिला बराच वेळ. हे नेमकं
काय बोलली ही आणि का बोलली त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत राहिला. अखेर
थकून आत येऊन झोपला.
पुढचे दोन दिवस ती
गप्प होती. बराच वेळ खोलीत किंवा गच्चीत एकटीच बसत होती. त्याने तिला छेडलं नाही. 'सांगेल आपणहून' हे त्याला अनुभवाने
माहीत होतं. तो वाट बघत राहिला ती पुन्हा बोलेल याची. आई मात्र नेहमीसारखीच वावरत
होती. म्हणजे काहीतरी वेगळं दिसतंय,
नेहमीचे मतभेद, वाद नसावेत. अखेर शनिवारी संध्याकाळी ती
दोघंच बाहेर पडली. सायली सोसायटीत खेळत होती. 'तुम्ही जा.' म्हणाली. ते पथ्यावर पडलं सुचेताच्या.
"कुठे?" स्कुटरला किक मारत
त्याने विचारलं.
" xxxx
बागेत." त्याला नवल वाटलं. पण न बोलता
त्याने बागेच्या दिशेने स्कुटर नेली. बाहेर स्कुटर पार्क करून दोघं आत शिरली. न
बोलता ती एका कोपऱ्याकडे गेली. आणि तिथल्या बाकावर जाऊन बसली. तिच्या पाठोपाठ
तोही.
५ मिनिटं वाट बघून
तो म्हणाला, "बोल आता. जे काही आहे मनात ते सगळं स्पष्ट बोल.
मी पण गोंधळलो आहे तुझ्या परवाच्या बोलण्याने."
"सासूबाईंचा माझ्यावर विश्वास नाही. इतके दिवस मी
मनावर घेतलं नाही, दुर्लक्ष केलं. त्यांच्याच आधारावर आपण मोठं घर
घ्यायचे बेत करतोय, माझी नोकरी चालू आहे हे सगळं मला मान्य आहे.
तरीही आता मला वेगळं राहायचंय."
"विश्वास नाही? म्हणजे? कपाट तर आपल्याच खोलीत आहे. बँकेचा लॉकर
तू ऑपरेट करतेस. आईने कधी तुला खर्च विचारला नाही, कशावर आक्षेप घेतला नाही आणि हे काय
मध्येच? विश्वास नाही म्हणजे?"
तिला रडू अनावर
झालं. त्याने तिला रडू दिलं. शांत झाल्यावर ती पुन्हा बोलायला लागली. यावेळी अधिक
ठामपणे.
"गेले कित्येक दिवस हा विचार माझ्या मनात घोळतोय.
आपण करतोय तो विचार बरोबर आहे की चूक हे पुन्हा पुन्हा तपासून घेतेय मी. पण मी वारंवार त्याच
निष्कर्षावर येतेय की त्यांचा माझ्यावर विश्वास नाही. आणि अरविंद, विश्वास काही फक्त
पैशा-अडक्याच्या बाबतीत नसतो. इतर कितीतरी बाबीत एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे
एका घरात राहणाऱ्या माणसांनी. त्या विश्वासाबद्दल म्हणतेय मी.
मी चांगली गृहिणी
आहे, घरकाम व्यवस्थित करू शकते, घर नीट चालवू शकते यावर त्यांचा विश्वास
नाही. ते त्या पदोपदी मला जाणवून देत असतात. मला आता ते नाही सहन होत. सायली मोठी
होतेय आता. आजीचं बघून तीही तसाच समज करून घेईल माझ्याबद्दल. मला नाही ते चालणार.
माझ्या मुलीने मला असं सतत कमी लेखावं हे ....." पुन्हा तिला भरून आलं. बोलता
येईना.
अरविंद पुरता
गोंधळला होता. वागण्यावर विश्वास नाही म्हणजे? नेमकं काय? काय म्हणतेय ही? पण त्याचा तिच्यावर
विश्वास होता. उगाच घायकुतेपणा करून ती असं टोक गाठणार नाही याची खात्री होती. तो
शांत बसून राहिला वेगवेगळे तर्क करत. ती बोलेल याची वाट पाहत.
जरा वेळाने ती उठली.
"चल,
जाऊ या."
"अगं,
वेगळं का राहायचं ते सांगत होतीस ना? आणि आईचा तुझ्यावर
विश्वास नाही म्हणत होतीस, ते काय ते सांगत होतीस ना?"
ती परत धपकन बसली.
भयंकर अस्वस्थ झाली होती. सगळं स्पष्ट बोलायचं होतं पण धीर होत नव्हता. अखेर सगळी
हिंमत एकवटून ती बोलायला लागली.
"सासूबाई, अतिशय टापटीप आहेत. शिस्तप्रिय आहेत. अजून
शरीर प्रकृती उत्तम आहे, त्यामुळे चपळाईने सगळी कामं उरकतात घरातली. आणि
मी तसंच करावं अशी अपेक्षा असते त्यांची. सतत माझ्याकडे लक्ष असतं, अगदी पहारा असतो. मी
काय करते, कसं करते ते अगदी बारकाईने बघत असतात. जरा इकडचं तिकडे झालं की अगदी
तत्परतेने ते नीट करतात. बोलत काही नाहीत, पण माझं काम असं त्यांनी नीट करावं, पूर्ण करावं हे नाही
आवडत मला. एन्ड रिझल्ट त्यांना हवा तसा असल्याशी कारण. स्वयंपाक करतांना कशानंतर
काय ते त्यांचं स्वतंत्र गणित आहे. त्याने पदार्थाच्या चवीत आणि कदाचित nutritional valueत फरक पडत असेल, म्हणून मी काहीही न बोलता त्या सांगतील तसंच
करायला शिकले. काही प्रश्न विचारले नाहीत, वाद घातला नाही. पण बाकीच्या कामात पण मी
त्या सांगतील तेच आणि तसंच केलं पाहिजे हा हट्ट का त्यांचा? नोकरी करते मी. माझी
time management वेगळी आहे. एखादं काम विसरू नये म्हणून काही वस्तू मी पुढे काढून
ठेवते, तर यांना नाही चालत. लगेच उचलून जाग्यावर ठेवतात. एखादे वेळी कामांचा
क्रम चुकला, नंतरचं आधी-आधीचं नंतर झालं तर घाईने येऊन ते काम
पूर्ण करतात. का पण? मला माझ्या पद्धतीने करू दे की. चव, स्वच्छता त्यांना
हवी तशी असल्याशी कारण. क्रम पण माझा मी ठरवायचा नाही का?"
एका दमात सगळं बोलून
ती गप्प बसली. अरविंदने टाळ्या वाजवून थोडं लांबून जाणाऱ्या रसवाल्या पोऱ्याचं
लक्ष वेधून घेतलं. हाताची दोन बोटं नाचवून दाखवली. तो रस घेऊन आला, दोघांनी रस प्यायला.
"सुचा, आई काही बोलत नाही म्हणतेस, मग कसला त्रास होतोय
तुला? मला नाही कळत आहे काही. आणि सायली मोठी होण्याशी काय संबंध आहे याचा? जरा आणखी सविस्तर
करून सांगतेस का?"
तिला पुन्हा रडू
फुटलं. 'मी याच्या आईच्या तक्रारी सांगतेय, आणि हा मला म्हणतोय सविस्तर सांग. काय
सांगू कपाळ.' पण निग्रहाने तिने भावना आवरल्या. आता तोंड
उघडलंच आहे, तर पुरतं बोलणंच शहाणपणाचं.
"अरे,
धीर नसतो त्यांना. म्हणजे हे काम राहिलंय, तर हातातलं काम
पूर्ण झालं की मी ते करीन याची खात्री नाही वाटत त्यांना. कारण त्यांच्या मते ते
आधी व्हायला हवं असतं. मग त्या पुढे होऊन ते करून टाकतात. म्हणजे मी करीन असा
विश्वास नाही वाटत असाच होतो ना याचा अर्थ?" अरविंद आणखी
गोंधळलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत राहिला. "तुला नाही कळायच्या या गोष्टी.
तू असं कर, पुढचे आठ दिवस नीट लक्ष ठेव घरात आम्ही दोघी काय करतो तिकडे. म्हणजे
कळेल तुला मी काय म्हणते ते." त्याने मान डोलावली.
दुसऱ्या दिवसापासून
ठरवून आईच्या नकळत तिचं निरीक्षण करायला लागला तो. सकाळी इस्त्रीवाला आला. धुतलेल्या
कपड्यांचं बोचकं घेऊन सुचेता आली. ड्रॉवरमधून डायरी काढली. आलेले कपडे तपासून
घेतले, धुतलेले दिले. आणि इस्त्रीचे कपडे घेऊन ती आत गेली. मधल्या टेबलवर
कपड्यांची नोंद करायची डायरी राहिली. कपडे कपाटात ठेवून येईपर्यंत आईने पटकन उठून
ती ड्रॉवरमध्ये ठेवली. "डायरी कुठे?" तिने मुद्दाम
विचारलं. "ठेवली मी जागेवर. तुला हवी होती का?" मानेने नाही म्हणत तिने
अरविंदकडे सहेतुक कटाक्ष टाकला. जेवणं झाल्यावर तिने खरकटी भांडी गोळा करून ठेवली.
आणि हात धुवून ती उरलेलं अन्न काढून ठेवायला लागली, ती रिकामी झालेली भांडी त्या भांडयांत
ठेवून सगळी एकदम न्यायची म्हणून. तर त्यांनी गोळा केलेली भांडी घाईने उचलून
सिंकमध्ये नेऊन ठेवली. तिने तिरक्या डोळ्याने पाहिलं, अरविंद पाहतोय की
नाही ते. तो पाहत होताच.
आणि पुढच्या चार
दिवसांत अशा बऱ्याच बारीक-सारीक घटना घडल्या. सुरुवातीला त्याला वाटलं, इतक्या लहान
गोष्टीचा कशाला बाऊ करतेय सुचा. अगदी वेगळं राहण्यापर्यंत. पण मग त्यालाच वाटलं की
तिला काहीतरी सलतंय, तर आपल्याशिवाय कोणाजवळ बोलणार ती? आपणच तिला आत्ता
समजून घ्यायला हवं. मग दोन दिवसांनी घडलेल्या घटनेनंतर त्याला कळलं की सुचाला
नेमकं काय टोचतंय. त्याने वेळीच काही हालचाल करणं गरजेचं आहे, नाहीतर या छोट्याशा
भेगेची भली मोठी दरी व्हायला वेळ लागणार नाही. आणि ते त्याला होऊ द्यायचं नव्हतं.
झालं असं की घरात
काम करणाऱ्या हिराबाई म्हाताऱ्या झाल्या होत्या. शनिवारी त्या सुचेताला म्हणाल्या, "वयनी, कंबर लय दुकतेय. फरशी नाय पुसत आज." सुचेता
म्हणाली, "चालेल मावशी. उद्या पुसा." त्या गेल्या आणि
शेजारी गेलेली आई परत आली. "हे काय, फरशी नाही पुसली हिराबाईंनी?"
"कंबर दुखतेय त्यांची, उद्या पुसते
म्हणाल्या." सुचेताने सांगितलं. तरी रविवारी आईने हिराबाईंना हटकलं फरशी
पुसण्यावरून. "कंबर दुकत होती माजी. मी सांगितलं होतं वयनीबायला."
त्यांनी सुचेताकडे बघितलं. तिने अरविंदकडे बघितलं. तो चटकन म्हणाला, "हो मावशी, तिने सांगितलं आईला कालच. पण आईने सहज विचारलं
तुम्हाला." आता आई चमकून त्याच्याकडे बघायला लागली. अरविंद घाईने तिथून निघून
गेला.
इतकी वर्षे आपल्या
कसा लक्षात नाही आला आईचा हा स्वभाव?
तिचं प्रत्येक गोष्टीत असं बारीक लक्ष देणं
आपल्या पथ्यावर पडत होतं म्हणून? की मांजरीची नखं तिच्या पिल्लाला लागत नाहीत असं
म्हणतात तसं झालंय? जे असेल ते. पण यावर काहीतरी उपाय करायलाच हवा.
आणि ताबडतोब.
रात्री अरविंद
सुचेताला म्हणाला, " सायली मोठी होऊन ... असं काहीतरी म्हणत होतीस. ते
काय?"
"गेल्या आठवड्यात एकदा भाजी चिरत होते. विळी धुवून
ठेवून परत फिरले, तर या बाई सालं, देठ गोळा करत होत्या. मी वळले म्हटल्यावर
थांबली आणि गेली तिथून. काल अंघोळीहून येऊन केस विंचरून पिन लावली आणि गुंतवळ
टाकायला गेले. परत येते तर या बाईसाहेब माझा टॉवेल उचलून हातात धरून उभ्या. हे
तिने आजीचं बघितलं असणार अरविंद." तो गप्प बसला. सुचेता फार वैतागली आहे
म्हणून तिला असं वाटतंय हे त्याच्या लक्षात आलं. ५ वर्षांच्या मुलीला इतकं कुठलं
कळायला? पण मग त्याला वाटलं आज नाही कळत, पण जशी मोठी होईल तसं कळेलच. तेव्हा तिची
आई किंवा माझी आई यांच्याबद्दल तिच्या मनात काहीतरी चुकीचा ग्रह घर करू शकतो. उघड
तो इतकंच म्हणाला, "मला थोडा वेळ देशील? मी विचार करतो काही
उपाय सापडतोय का, आईच्या लक्षात आणून देता येतंय का त्याचा. नाही
तर मग बघू काय करायचं ते." तिने फक्त मान डोलावली. त्याला हायसं वाटलं.
सतत विचार करून डोकं
तडकायची वेळ आली, पण काही उपाय सुचेना. आणि आता आईच्या आणखी छोट्या
छोट्या गोष्टी पण लक्षात यायला लागल्या. अखेर त्याने नाईलाजाने संधी बघून बाबांजवळ
हा विषय काढला. ते गप्प ऐकत होते. "बाबा, बोला ना काहीतरी. अवघड झालंय सगळं. सुचेता
फार अस्वस्थ झालीय हो. वेगळं राहू या म्हणतेय. इतक्या छोट्या कारणासाठी.... म्हणजे
काही उपाय असला तर तो करू या ना आधी."
"ती अशीच आहे पहिल्यापासून अरविंद. मी हळूहळू अंग
काढून घेत गेलो सगळ्यातून. मी आणि माझं कॉलेज इतकं मर्यादित करून घेतलं मी माझं
जग. ती अगदी टोकाची perfectionist
आहे त्यामुळे तिला कुणाचं काही पटत नाही. सगळ्या
गोष्टी तिच्याच तंत्राने व्हायला हव्यात. तरी ती सूनबाईच्या कामात फार ढवळाढवळ
नाही करत. माझ्या आलंय लक्षात - सुनबाई अलीकडे गप्प गप्प असते घरात. गच्चीत किंवा
खोलीत जास्त वेळ काढते. मी बाजूला झालो, तशी ती नाही होऊ शकणार. त्याचे अर्थ वेगळे
काढले जातील. पण यावर उपाय - - - मला सुचला असता तर मी आधीच केला नसता का?"
दोन दिवसांनी ते
म्हणाले, "तू एखाद्या counsellor कडे का जात नाहीस?"
"बाबा, मानसिक आजारी माणसं जातात त्यांच्याकडे
उपचार करून घ्यायला. आई काय आजारी आहे का?"
"नाही अरविंद, मानसिक आजारावर उपचार करणारे psychiatrist असतात. हे लोक फक्त आपल्यातल्या काही
गुणावगुणांवर प्रकाश टाकतात. गरज पडली तर तेच सुचवतात डॉक्टरकडे जायला. तू जाऊन तर
बघ."
नाईलाजाने अरविंद
एका counsellor कडे गेला. सगळं
सविस्तर सांगून म्हणाला, "आईला नाही मी आणू शकणार तुमच्याकडे. एरवी काही
सल्ला देऊ शकाल का?"
त्या क्षणभर विचारात
पडल्या. "त्या व्यक्तीशी समक्ष बोलल्याशिवाय परिस्थितीचं पूर्ण आकलन कसं
होणार? पण तुमची केस जरा वेगळी आहे." असं म्हणून त्यांनी आणखी काही
तपशील विचारले. "मला वाटतं, perfection
च्या ध्यासापोटी त्या नकळत असं वागतायत. सकाळच्या
वेळात त्या मोकळ्या असतात, म्हणून मग इकडे लक्ष जात असावं त्यांचं. तुम्ही
त्यांच्या इतर काही आवडी, स्किल्स काय त्याचा शोध घ्या. सकाळच्या वेळी, म्हणजे तुमच्या
मिसेस काम करत असतांना, त्या गुंतून राहतील असा काहीतरी जॉब त्यांच्या
पुढ्यात येऊ दे. तिकडे त्यांचं लक्ष वळलं तर कदाचित इकडे लक्ष जाणार नाही."
आणखी काही सूचना दिल्या त्यांनी.
अरविंद पुन्हा
बाबांकडे आला मदतीसाठी. आता तेही विचारात पडले. तिची इतर स्किल्स - घर हेच जग होतं
तिचं. सुरुवातीची काही वर्षे तिने एका छोट्या सहकारी बँकेत नोकरी केली होती. पण ते
काम अगदी रुटीन असतं. त्यात फार मोठं स्किल - - - एकदम त्यांच्या लक्षात आलं.
बरोबर. अर्थशास्त्र घेऊन बी.ए. आहे ती. तेव्हा या विषयावर बोलायची आवडीने. पण आपण
कधी फारसा प्रतिसाद दिला नाही, मग आपोआप बंद झाली बोलायची. आता दोघांनी ठरवून
सकाळी पेपरातल्या 'अर्थ'विषयक कॉलमवर टिप्पण्या करायला सुरुवात
केली. सुरुवातीला त्या फक्त ऐकायच्या. ४-६ दिवसांनी त्यांनीही बारकाईने पेपर
वाचायला सुरुवात केली. अपेक्षित परिणाम साधतोय अशी चिन्हं दिसतायत म्हटल्यावर
अरविंदला बरं वाटलं. सुचेतालाही तो धीर देत होता. "मी प्रयत्न करतोय. मला
अजून थोडा वेळ दे, प्लिज. सुचा, अगदीच नाही जमलं तर बघू. पण एकदम
काहीतरी...." तिने त्याला थांबवलं. "मला कळतंय. बघेन मी वाट अजून थोडी.
त्यांना तोडून वेगळं घर करण्याचा माझा हेतू इतके दिवस नव्हता. पण.... तू कर प्रयत्न."
महिन्याभराने
त्यांनी अरविंदला एक पुस्तक आणायला सांगितलं. "कसलं गं?"
"अरे त्या कॉलममध्ये एका इकॉनॉमिक्स हँडबुकचा
उल्लेख करतात ते लेखक नेहमी. म्हटलं काय आहे ते बघावं."
"आई,
काहीही काय." त्याने मुद्दाम डिवचलं.
"काहीही काय त्यात? इकॉनॉमिक्स घेऊन graduate आहे मी. वाचलं की
कळेल मला काय ते."
त्याने २ दिवसात
पुस्तक आणलं. आणि त्या त्यात गुंतल्या. सकाळी फायनान्स कॉलम बारकाईने वाचायचा, पुस्तकात त्याचे
संदर्भ बघायचे हे सुरू झालं. त्याला हायसं वाटलं. सुचेताही थोडी सैलावली.
एक दिवस रात्रीची
जेवणं झाल्यावर त्या म्हणाल्या,
"अरविंदा, हे मी लिहीलंय थोडं. पाठवू का रे पेपरकडे? छापतील?" तो थक्क झाला. हे त्याच्या कल्पनेच्या पलीकडे काहीतरी घडत होतं.
"आई, छापतील की नाही तो पुढचा प्रश्न. तू इतकं इंटरेस्ट घेऊन लिहिलं आहेस
हेच महत्त्वाचं. दे इकडे. मी टाकतो उद्या पोस्टात."
तो लेख संपादित
स्वरूपात छापून आला आणि त्यांच्या साचलेल्या क्षमतेला प्रवाह सापडला. सकाळी
वाचायचं आणि संध्याकाळी लिहून काढायचं. दिवसभर सुचेता घरी नसतांना त्या घरात लक्ष
द्यायच्या. सायली शाळेतून घरी यायची,
तिच्याकडे लक्ष द्यावं लागायचं. त्यामुळे नकळत
सुचेता घरात असतांना त्या आपल्या वाचन-लेखनात व्यग्र राहायला लागल्या. सुचेताही
पुन्हा पूर्वीसारखी मोकळी झाली.
ही कहाणी सुदैवाने
सुफळ संपूर्ण झाली. पण सगळ्या कहाण्या अशा होत असतील का?
अरविंद-सुचेताची कथा
माझ्या ज्येष्ठ समुपदेशक मैत्रिणींनी मला सांगितली. नेहमीप्रमाणे केस क्लोज
झाल्यावर. नावं, घटनाक्रम आणि संवाद ही माझी भर.
"मी तुला केस सांगितली आणि आता तू याची कथा करशील.
सांगणं आणि लिहिणं अगदीच सोपं. पण प्रत्यक्षात फार कठीण गेलं हे सगळं त्यांना.
माझ्याकडे आला तेव्हा अगदी पार मोडून गेला होता तो. आई आणि बायको यातल्या कुणालाच
न दुखवता त्याला हा तिढा सोडवायचा होता. मलाही हे जरा कठीण जाणार होतंच. कारण समोर
बसलेल्या व्यक्तीचं काही निरीक्षण,
काही ठोकताळे असतात आमचे. नुसतं ऐकून काही अंदाज
बांधणं.... आणि सल्ले तर मी क्वचित देते. निर्णय ज्याचा त्याने घेणं अपेक्षित असतं
आमच्या व्यवसायात. पण मी सुद्धा हे वेगळ्या केसचं आव्हान घेतलं. मुळात घरातली
माणसं सुशिक्षित, समंजस होती. निव्वळ परिस्थिती बदलतेय हे लक्षात न
आल्यामुळे झालेला गोंधळ होता. पण आईला नव्या छंदाकडे वळवतांना अक्षरश: सगळी ताकद
लावली त्याने. वडिलांचाही फुल सपोर्ट होता.
<<कसं असतं सांगू का अशा perfectionist लोकांचं. आपलं बरोबर आहे हे इतकं मनावर
ठसलेलं असतं की समोरच्याला वेगळी बुद्धी आहे, निर्णयशक्ती आहे हे लक्षातच येत नाही.>> मग असे गोंधळ होतात. या केसमध्ये जर तो आईला काही सांगायला गेला असता
तर कदाचित टिपिकल 'सासू' reaction झाली असती त्यांची.
म्हणजे 'माझा मुलगा बदलला' वगैरे. किंवा बायकोला समजवायला गेला असता तर
पुन्हा उलट बाजुने 'माझी काही पर्वाच नाही'. साधारण ७-८ महिने
त्यांचा फीडबॅक येत होता मला.
ही केस तशी लेटेस्ट
आहे. दीड-दोन वर्षे झाली. पण साधारण ४ वर्षांपूर्वी अशीच एक केस होती. अशीच
रिकामपणातून उद्भवलेली. तिथे तो नवरा सतत बायकोच्या कामात लुडबुड करायचा, सूचना करायचा.
रिटायर झाल्यावर 'बायकोवर पहारा' हा नवा जॉब लावून घेतला त्याने स्वतःला.
सांगून-समजावून झालं, चिडून-भांडून झालं, निघून जाईन अशा धमक्या देऊन झाल्या. पण याचा
पहारा कमी होईना. एक दिवस तो पत्ते क्लबला गेल्यावर हिने बॅग भरली आणि सरळ जाऊन
विमानतळ गाठला. ऑनलाईन तिकीट काढून बसली अमेरिकेच्या विमानात. फोनवर भल्या मोठ्या
रकमेचे डेबिट अलर्ट आल्यावर हा दचकला. काय खर्च केला विचारायला फोन केला तर
म्हणाली 'मी चालले अमेरिकेला मुलाकडे. तुम्ही बसा आता स्वतःवर पहारा देत एकटे.' त्याला जबर धक्का
बसला. मुलाला कळवायचंही सुचेना. दुसऱ्या दिवशी दिवसभर काही हालचाल दिसेना म्हणून
शेजाऱ्यांनी दार वाजवलं तर हा जवळ जवळ डिप्रेशनमध्ये.
तिकडे आई विमानतळावर
उतरून मुलाला फोन करून सांगतेय मी आलेय, मला न्यायला ये. तोही धक्क्यात. इथून
शेजाऱ्यांनी फोन केला त्याला. वडील आजारी. आईला समजावून कसा बसा तो तिला परत घेऊन
आला. मग कुणीतरी माझं नाव सुचवलं. आणि सगळी वरात आली माझ्याकडे. २ सेशन्स झाल्यावर
मुलगा परत गेला. पुढचे आठ महिने या दोघांची सेशन्स चालू होती. तिची बाजू कितीही
बरोबर दिसत असली तरी असा घायकुता निर्णय 'धडा शिकवण्यासाठी' घेणं हेही गंभीरच.
त्या माणसाला नोकरी संपल्यावर प्रचंड रिकामपण आलं. घरकाम हे 'फुटकळ' काम, 'त्यात काय, मी पण करू शकतो' असा आविर्भाव.
त्यातून तिला येत गेलेला कॉम्प्लेक्स,
साचत गेलेला राग, तिच्या निषेधाकडे त्याने केलेलं दुर्लक्ष
या सगळ्याचा परिणाम हा झाला. आता त्या गृहस्थाने घेतलंय गुंतवून स्वतःला. त्या
बाईना नंतर खूप अपराध गंड (guilt
complex) आला. नवऱ्याला आपण या वयात एकटा टाकून
गेलो, त्याला आपल्यामुळे डिप्रेशन आलं याचा. मुळात चार चौघांसारखं सुशिक्षित
जोडपं. अंगावर कोसळलेला अति एकांत त्यांचा घात करून गेला.
मी नेहमी म्हणते ना
तुला, बदलती जीवनशैली, बदलती कुटुंब, प्रत्येकाचा काही न काही इगो या सगळ्याचा
परिणाम आहे हा. फार मोठ्या बदलाला सामोरे जातोय आपण सगळेच. हा बदल सहज स्वीकारणं
सगळ्यांनाच नाही साधत. आम्हाला सुद्धा २-३ वर्षांनी फ्रेशर कोर्स करावा लागतोय.
समस्यांचा परीघ इतका विलक्षण विस्तारतोय की कधी कधी भीती वाटते. असो. आज लेक्चरच
दिलं तुला. चालव आता तुझा कीबोर्ड."
सुन्न झाले मी ऐकून.
सुसंगत मांडायला मलाही जरा कष्ट पडलेच. सुचेता किंवा तिच्या सासूबाई कुणाबद्दलच
नकारात्मक भावना यायला नको होती वाचकांच्या मनात. कारण त्या दोघी मनाने सरळ
स्त्रिया आहेत. फक्त एकमेकींना समजून घ्यायला कमी पडल्या. अरविंदाने सगळं झेलून
कुशलतेने, सावधपणे सोडवल्या गाठी. त्याला त्याचं घर पूर्वीसारखं घट्ट बांधून ठेवायचं
होतं.
माणसं नेहमीच वाईट
नसतात. कधीतरी परिस्थिती त्यांना फसवते, पेचात पकडते.
आपला संवेदनशील ललित लेख फारच प्रेरणादायी आहे.... अभिनंदन!
ReplyDelete