आठवणी

आठवणी

पेठेतला वाडा बिल्डरला द्यायचा निर्णय बाबांनी पक्का केलेला ऐकून वैभव अगदी अस्वस्थ झाला. बाबांनी आपलं न ऐकता हा निर्णय घेतला म्हणून नाराजही झाला. २ दिवस अगदी गप्प गप्प होता घरात. अखेर सुषमा त्याला म्हणालीच, आपण इथे अमेरिकेत, वाडा तिकडे महाराष्ट्रात-भारतात. आपण आता परत जाणार आहोत का तिथे? उगाच काय लहान मुलासारखा रुसून बसलायस? शनिवारी परत विडिओ कॉल कर बाबांना आणि स्पष्ट काय ते बोल आणि सविस्तर सगळं विचार.

शनिवारी त्याचा विडिओ कॉल त्याच्या बाबांना अपेक्षित होताच बहुतेक. त्यांनी त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि मग म्हणाले, “वैभव, तुझ्या फक्त लहानपणच्या आठवणी या वाड्याशी निगडित आहेत. १८व्या वर्षी शिक्षणासाठी घर सोडलंस, तो बाहेरचाच झालास. माझं सगळं आयुष्य गेलंय इथे. इथेच मी जन्मलो-मोठा झालो, तुझी आई इथेच माप ओलांडून आली, तुझा जन्मही इथेच झाला. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या-वाईट घटनांशी हा वाडा जोडला गेलाय. तरी मी उरावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय, त्याला काहीतरी कारण असेलच ना. वैभव गप्प राहिला.

दिवस पालटतात तसं माणसाने आपली मतं बदलायला हवीत. इतका मोठा वाडा सांभाळणं आता फार कष्टाचं आणि खर्चिक होत चाललंय. मी पैसे पाठवीनअसं तू म्हणशील आणि वेळ पडली तर खरंच पाठवशील सुद्धा. पण ते व्यवहार्य ठरेल का? पैसे तू देशील, कष्ट आम्हालाच करावे लागतील ना? आणि वैभव, सुट्टीला आल्यावर या वाड्यात तुला थंड वाटतं असं तू म्हणालास; पण वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी दीड दिवस आणि एक रात्र तू इथे असतोस. इथे असतोस, घरी असतोस का? तो वेगळा मुद्दा. पण त्या दीड दिवस आणि एका रात्रीसाठी उरलेले तीनशे साडेत्रेसष्ट दिवस आम्ही इथे देखभाल करण्याचे कष्ट उपसायचे अशी अपेक्षा करतोयस हे लक्षात येतंय का तुझ्या?
आणि आठवणी काय रे, आपण जिथे राहतो तिथल्या आठवणी आपोआप आपल्या मनात साठत जातात. तू नव्या बंगल्यात राहिलास की तिथल्या आठवणी येतील तुला परत गेल्यावर. वाडा सोडून बिल्डरने दिलेल्या बंगल्यात राहायला जातांना आमचेही पाय जड होणारच आहेत, पण ही आमच्या वयाची गरज आहे हे लक्षात येतंय का तुझ्या? नव्या घरात शक्य तितक्या वाड्याच्या खुणा जपण्याचा प्रयत्न आम्ही करू, पण आमच्या वाढत्या वयाच्या सोयी सांभाळूनच हे नक्की. रोजचं जगणं सोपं करूनच भूतकाळात रमावं हेच खरं आणि बरंही.
शांतपणे विचार कर. म्हणजे तुला पटेल माझं म्हणणं. आणि आम्ही काही उद्या जात नाही वाडा सोडून. कागदपत्रं, कायदेशीर नोंदी हे सगळं व्हायला सहा महिने जातीलच. शक्य असलं तर एकदा येऊन जा, दोन दिवस इथे राहिलास की जरा बरं वाटेल तुलाही.

कॉल संपल्यावर वैभव शांत बसून राहिला बराच वेळ. हळूहळू शांत झाला, बाबांचं म्हणणं पटलं. पण तरी दीड दिवस आणि एक रात्र इथे राहतोस, त्यासाठी उरलेले तीनशे साडेत्रेसष्ट दिवस.....हे वाक्य मात्र त्याला टोचत राहिलं.

कितीही दुखलं तरी खरंच बोलले होते बाबा. सुट्टीवर भारतात गेलं की घरी निवांत राहणं होत नाही हे खरंच. किती वर्ष झाली घर सुटून. बारावीनंतर मुंबईला गेलो IIT साठी. तिथून MBA साठी इथे आलो ते इथलेच झालो. मधले १५ दिवस घरी होतो, पण बाहेरच असायचो बराच वेळ. इथे आल्यावर शिक्षण, नोकरी - त्यात स्थिर होणं. मग सुषमा इथेच भेटली. तिचं घर नाशिकला. लग्नापुरते ८ दिवस भारतात गेलो दोघं. हळूहळू त्याच्या डोळ्यात पाणी साचलं, घशात दुखायला लागलं. श्वास कोंडल्यासारखा झाला. त्याने घड्याळ पाहिलं, फार उशीर नसेल झाला तिकडे घरी.

त्याने परत फोन केला. बाबा, पटलंय तुमचं म्हणणं. या वयात एकट्याने सगळं मॅनेज करणं तुम्हाला जडच जात असेल हे नाही लक्षात आलं माझ्या. तुम्हाला जे सोयीस्कर आणि सुखकर असेल तेच करा तुम्ही. आठवणी वास्तूच्या असतात, तशा माणसांच्या पण असतात. त्या तर कायम राहतील माझ्याजवळ. घर सोडतांना थोडं आधी कळवा, जमलं तर येऊन जाईन मी."

त्याने फोन ठेवला. आणि सुषमाच्या मांडीवर डोकं ठेवून त्याने अडवून ठेवलेल्या अश्रूंना मुक्त वाट करून दिली.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

ललित साहित्य - कथा

दुसरं लग्न