ललित साहित्य - कथा


ललित लेखन – कथा

ललित लेखनाचा एक लोकप्रिय प्रकार म्हणजे कथा. आता मुळात ललित लेखन हे वास्तवावर आधारलेला कल्पनेचा डोलारा अशा स्वरूपाचं असतं, त्यामुळे कथेत कल्पनेची भरारी असणार हे उघड आहे. पण प्रत्येक कथा प्रकारात कल्पनेचा अविष्कार वेगवेगळ्या पध्दतीने केलेला आपण पाहतो.

कथेचे तर अनंत प्रकार आहेत – प्रेम कथा, कुटुंब कथा, विद्रोही कथा, पुराण कथा, ऐतिहासिक कथा, नव कथा, भय कथा, रहस्य कथा हे आपल्या ओळखीचे काही प्रकार. कथेत एक मुख्य सूत्र आणि उद्देश असावा लागतो. नायक/नायिका, त्यांच्या आजूबाजूची माणसं ही गरजेप्रमाणे असतात. म्हणजे एखादी कथा नायिकेची असते, त्यात इतरांना कमी अधिक महत्त्व असतं. एखाद्या कथेत नायक असतो. नायक-नायिकेचं वय, शिक्षण, आर्थिक/सामाजिक परिस्थिती, धर्म, जात, राष्ट्रीयत्व लेखकाच्या मर्जीनुसार ठरतं. पण तहात निव्वळ निवेदन नसतं. त्या निवेदनाला थोडी भावनिक डूब असते. अगदी विद्रोही कथा असली तरी विद्रोहातली जळजळीत धार वाचणाऱ्याला जाणवली पाहिजे.

मी एखाद्या भाजीवालीची कथा लिहिणार असेन. तर ती घाऊक बाजारात जाते, भाजी विकत घेते, त्यांचे वाटे करते, ठराविक ठिकाणी बसून विकते ही तिची दिनचर्या आणि व्यापाराचे तपशील, आकडे लिहिले तर ती कथा नाही होणार. भाजीविक्री करण्याच्या व्यवसायाचे तपशील. पण भाजीचा धंदा करण्यामागची तिची कारणं आणि मानसिकता, भाजी विकतांना तिला आलेले अनुभव, गिऱ्हाईक कोण आहे-कसं आहे हे पारखतांना तिने लावलेले निकष, त्यावरच्या तिच्या मनात उमटणाऱ्या प्रतिक्रिया या सगळ्याचे चित्रण मी करीन. ते काल्पनिक असेल माझ्यापुरतं. पण एखाद्या भाजी विकणाऱ्या बाईच्या मनात खरोखर ते विचार येऊ शकतात हे मी विसरून चालणार नाही, वाचकांना हे सगळं स्वाभाविक वाटायला हवं. ती कथा वाचतांना त्यांना आपण रोज भाजी घेतो ती बाई आठवली पाहिजे. पुरुष भाजीवाला असेल तर त्याची बायको/आई/बहिण अशीच कुठेतरी भाजी विकत असेल आणि ती अशीच असेल असे चित्र मनात उभे राहिले पाहिजे. भाजीवालीला घर असतं, आई-बाप, सासू-सासरे, भावंडं, नवरा-मुलं बाळ असतात, तिच्या वस्तीत तिच्या शेजारणी, मैत्रिणी असतात, तिला उधार माल देणारे दुकानदार असतात, तिच्या बाईपणाचा फायदा घेऊ पाहणारे खलप्रवृत्ती पुरुष असतात या सगळ्या वास्तवाची कल्पना करून ते खरं वाटेल अशा पध्दतीने शब्दबध्द करणं हे यशस्वी कथालेखन ठरावं.

हे केवळ उदाहरण दिलं. अधिक नेमकं लिहायचं तर आपण जे वाचतोय ते स्वत:ला लागू करून पाहिलं तरी ते खोटं किंवा अतिरंजित वाटता कामा नये. मनुष्य स्वभावात वेगवेगळे कंगोरे असतात. ते त्यांच्या वेगळेपणासकट सूक्ष्म तपशीलात वर्णन केले गेले तर ते वाचणाऱ्याला जवळचे वाटतात. ते वाचतांना भोवतीच्या व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीची आठवण येणं हे त्या व्यक्तिचित्रणाच यश मानावं लागेल.

माणसाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्तर बदलला की त्याच्या मानसिकतेत पडणारे फरक कथेत दिसले पाहिजेत. वेगळ्या स्तरातल्या माणसाचं वेगळ वागणं, किंवा एकाच माणसाचा स्तर बदलला की त्याचं बदललेलं वागणं किंवा स्तर बदलला तरी वागण्यात न झालेला बदल असा कुठल्याही अंगाने झालेला किंवा न झालेला बदल टिपण्याची तरलता आणि त्याचं यथार्थ चित्रण कथेचा प्राण असतं.

आपण तयार केलेल्या मूर्तीत प्राण फुंकण्याच कसब म्हणजे कथालेखन असं म्हटलं तरी चालेल.

राधा मराठे
२२.०६.२०१७

Comments

  1. फार पुरेपूर माहिती मिळाली 👌👌✍️
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. गजल आणि कविता यामंधील साम्य आणि फरक स्पष्ट कराल का? सोबतच पुरेशी माहिती...!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ललित साहित्य - ललित लेखन

दुसरं लग्न