आठवणी
आठवणी पेठेतला वाडा बिल्डरला द्यायचा निर्णय बाबांनी पक्का केलेला ऐकून वैभव अगदी अस्वस्थ झाला. बाबांनी आपलं न ऐकता हा निर्णय घेतला म्हणून नाराजही झाला. २ दिवस अगदी गप्प गप्प होता घरात. अखेर सुषमा त्याला म्हणालीच , “ आपण इथे अमेरिकेत , वाडा तिकडे महाराष्ट्रात-भारतात. आपण आता परत जाणार आहोत का तिथे ? उगाच काय लहान मुलासारखा रुसून बसलायस ? शनिवारी परत विडिओ कॉल कर बाबांना आणि स्पष्ट काय ते बोल आणि सविस्तर सगळं विचार. ” शनिवारी त्याचा विडिओ कॉल त्याच्या बाबांना अपेक्षित होताच बहुतेक. त्यांनी त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि मग म्हणाले , “ वैभव , तुझ्या फक्त लहानपणच्या आठवणी या वाड्याशी निगडित आहेत. १८व्या वर्षी शिक्षणासाठी घर सोडलंस , तो बाहेरचाच झालास. माझं सगळं आयुष्य गेलंय इथे. इथेच मी जन्मलो-मोठा झालो , तुझी आई इथेच माप ओलांडून आली , तुझा जन्मही इथेच झाला. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या-वाईट घटनांशी हा वाडा जोडला गेलाय. तरी मी उरावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय , त्याला काहीतरी कारण असेलच ना. ” वैभव गप्प राहिला. “ दिवस पालटतात तसं माणसाने आपली मतं बदलायला हवीत. इतका मोठा वाडा सा...